डॉ. बाबा आढाव : रिक्षा चालकांचे पुन्हा आंदोलन
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले मूक आंदोलन
पुणे : “सरकार कोणतेही असो, रिक्षा चालकांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले जात नाही. बाइक टॅक्सीवर बंदी आणण्यासह रिक्षा चालकांचे विविध प्रश्न मुख्यमंत्र्यांनी सोडवावेत. अन्यथा त्यांचा ताफा अडविण्याचा सत्याग्रह केल्याशिवाय आपण राहणार नाही,’ असा इशारा रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी सोमवारी दिला.
रिक्षाचालक आंदोलकांवरील गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घ्यावेत. बाइक टॅक्सी कंपनीच्या संचालकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी रिक्षा पंचायतीसह, विविध रिक्षा संघटनांनी डॉ. आढाव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक आंदोलन केले. यावेळी विविध रिक्षा संघटनांचे पदाधिकारी, टेम्पो पंचायतीचे उपाध्यक्ष भरत गेडेवाड, पथारी व्यावसायिक पंचायतीचे सहसचिव मोहन चिंचकर, इकबाल आळंद, युवक क्रांती दलाचे जांबुवंत मनोहर हे उपस्थित होते.
डॉ. आढाव म्हणाले, “सामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न बाजूला ठेवून केवळ भावनिक मुद्द्यांवर सध्याचे राजकारण सुरू आहे. सरकारने रिक्षा चालक कल्याणकारी मंडळ, सीएनजी सारख्या इंधनाच्या चढत्या दराला आळा, मुक्त रिक्षा परवाना, परवाना मुक्त इलेक्ट्रिक वाहने आदी विषयांवर काहीही कार्यवाही केलेली नाही.
उलट, रोजगार निर्मितीच्या नावाखाली रिक्षा चालकाची भाकरी ओढत खासगी दुचाकीद्वारे प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना पाठीशी घालण्याचे काम सरकारने करत आहे. याविषयी रिक्षा चालकांच्या मनात संताप आहे. त्यामुळे 12 डिसेंबर रोजी रिक्षा बंद व चक्का जाम आंदोलन झाले. हे आंदोलन करणाऱ्या संघटनांच्या नेत्यांवर गंभीर गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत.’