पुणे,{प्रभात वृत्तसेवा}– पुण्यातील तरुणाचा आसाममधील गुवाहाटी शहरात खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक केली आहे. अनैतिक संबंधातून खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
संदीप सुरेश कांबळे (वय ४४, रा. येरवडा) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अंजली शाॅ, विकासकुमार शाॅ यांना अटक करण्यात आली आहे. संदीप यांचा गुवाहाटी शहरातील तारांकित हाॅटेलमध्ये सोमवारी (५ फेब्रुवारी) मृतदेह सापडला. याप्रकरणाचा तपास गुवाहाटी पोलिसांकडून करण्यात आला. तपासात पश्चिम बंगालमधील महिलेसह तिच्या साथीदाराने कांबळे यांचा खून केल्याची माहिती मिळाली, त्यानंतर पोलिसांच्या पथकाने अंजली आणि तिचा साथीदार विकासकुमार यांना अटक केली.crime
आरोपी अंजलीची संदीप याच्याशी कोलकात्ता येथील विमानतळावर ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघे एकमेकांना भेटण्यासाठी येत-जात होते. अंजलीने विवाहास नकार दिल्यानंतर संदीप यांने अंजलीच्या नातेवाईकांसह छायाचित्रे सोशल मीडियावरही टाकली, त्यामुळे अंजलीने मित्र विकासकुमारच्या मदतीने संदीपच्या खुनाचा कट रचला. त्याला गुवाहाटीत भेटायला बोलावले. संदीपनेच तारांकित हाॅटेलमध्ये खोली घेतली. तर अंजलीने तिचा मित्र विकासकुमारसाठी एक खोली आरक्षित केली. तेथे अंजलीने संदीप याला छायाचित्रे सोशल मीडियावरून हटविण्याची मागणी केली,
संदीपने नकार दिला. त्यानंतर तिने मिठाईतून त्याला गुंगीचे ओैषध दिले. तेथे विकास आला, त्याने संदीप याला मारहाण केली. हाॅटेलमधील कर्मचाऱ्यांनी संदीप याला बेशुद्धावस्थेत रूग्णालयात दाखल केले. परंतु, त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. कोलकात्याला पसार होण्याच्या तयारीत असलेल्या अंजली आणि विकास याला गुवाहाटीतील कामाख्या रेल्वे स्थानकाच्या आवारात पकडण्यात आले.