मुंढवा (प्रतिनिधी) – मुंढवा येथील महात्मा फुले चौकात मंगळवारी (दि. ११ ) दुपारी तीनच्या सुमारास डंपरची जबर धडक बसल्याने पादचारी महिला गंभीर जखमी झाली तिला उपचारार्थ ससून रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापुर्वी डॉक्टरांनी मृत घोषित केले.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार लिलाबाई देवप्पा कांबळे (वय- ६७, रा. सर्वोदय कॉलनी मुंढवा) असे मृत महिलेचे नाव आहे.
लिलाबाई कांबळे या बधे वस्तीवरुन भाजीपाला घेऊन चौकातून पायी घरी जात असताना रस्ता ओलांडत असताना खराडीकडून मुंढव्याकडे वळणाऱ्या मालवाहतूक हायवा क्रमांक एम.एच. १२ के.पी.२१६२ च्या धडकेने चाकाखाली आल्या. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या लिलाबाई यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले .पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरिक्षक विष्णू ताम्हाणे करीत आहेत.
प्रशासन अजुन किती जणांचे बळी घेणार…
महात्मा फुले चौक रहदारीसाठी अत्यंत धोकादायक असल्याचे आज पुन्हा प्रचिती आहे. रस्ता ओलांडताना पुन्हा एकदा निरपराध ज्येष्ठ महिलेचा आज मृत्यू झाला. आजतागयत अनेक निरपराध नागरिकांचे जीव याच चौकात गेले आहेत. तरी येथील प्रशासनाला जाग काही येत नाही.
महात्मा फुले चौक मोठा होणे, येथील रस्त्यांचे रुंदीकरण होणे, पायी रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना एखादा पूल उभारणे, ग्रेड सेपरेटर करणे अशी अनेक कामे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. किती सरकारे बदलली, आमदार बदलले, नगरसेवक बदलले परंतु या महात्मा फुले चौकात सामान्य नागरिकांना रस्त्यातच आपली जीव गमवावा लागत आहेत. वाहतुक विभागाच्या पोलीसांचेही दुर्लक्ष होत आहे.
अनेकदा रिक्षाचालक, सामाजिक कार्यकर्तेच वाहतुक नियोजनाचे काम करताना दिसतात. पोलीस मात्र वाहने बाजुला घेऊन पावती फाडण्याच्या कामात व्यग्र असल्याचे नागरिक सांगतात. मुंढवा खराडी बायपास रस्त्यावर दिवसा जड वाहनांना प्रवेश बंदी असल्याचे परिपत्रक असताना या रस्त्यावर ही वाहने कशी सुरु आहेत. याचा खडा सवाल नागरिक विचारत आहेत.
यामुळे या जड वाहनांमुळे हा अपघात झाल्याची आज सर्वांना प्रचिती आली. याच चौकात अनेक रिक्षाचालक बेकायदेशीरपणे धंदा करताना दिसतात. ग्राहकांची अरेरावी करुन अनेक वेळा कोयता काढून भांडणे करीत असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले. त्यामुळे महात्मा फुले चौकात शाळेतील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला यांनी रस्ता ओलांडणे म्हणजे जीव धोक्यात घालणे अशी परिस्थिती आहे. तरी येथील रस्त्यांचे रुंदीकरण करुन, तसेच रस्त्यांना डांबरीकरण करुन येथील सुविधांबाबत प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.