पुणे- सलग 15 व्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सोमवारी कायम होता. शहरातील प्रमुख आगारांमध्ये “जैसे थे’च चित्र होते. तर दुसरीकडे प्रवाशांना गैरसोय, आर्थिक भुर्दंड आणि मनस्ताप सोसावा लागत आहे.
सध्या स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन या प्रमुख आगारांतून बसेस, टेम्पो ट्रॅव्हलर, जीप, चारचाकी वाहनांद्वारे प्रवासी वाहतूक सुरू आहे. परंतु, अनेकांकडून जादा भाडे आकारण्यात येत आहे. तर “कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. तुमचे आंदोलन सुरू ठेवा,’ अशा प्रतिक्रिया काही प्रवासी देत आहेत.
स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवाडी) आणि पुणे स्टेशन या प्रमुख आगारांतून फक्त शिवनेरी आणि शिवशाही बसेसचे संचलन सुरू आहे. सोमवारी पुणे विभागातून 80 हून शिवनेरी आणि शिवशाही बसेसचे संचलन झाले. यामध्ये नाशिक, औरंगाबाद, दादर, सांगली, मिरज, ठाणे, बारामती, कोल्हापूर या मार्गांचा समावेश आहे. याद्वारे सुमारे 1 हजार 200 हून अधिक जणांनी प्रवास केला.
प्रवासी हतबल
“संपामुळे गैरसोय तर होतच आहे. संप मिटेल तेव्हा मिटेल. भाडेवाढ किंवा संप असो आम्हाला प्रवास करावा लागणारच. खासगी बस किंवा वाहनांतून प्रवास करण्याशिवाय कोणताही पर्याय आमच्याकडे नाही,’ अशी प्रतिक्रिया काही प्रवासी व्यक्त करत आहेत.
दिवाळीत 10 हजार रुपयांचा ऍडव्हान्स मिळतो. पण, यंदा तो पण दिला नाही. फक्त पगार आणि बोनस मिळाला. जोपर्यंत विलिनीकरणाची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही संपाच्या भूमिकेवर ठाम आहोत. विविध संघटनांनी आम्हांला पाठिंबा दिला आहे. सध्या वाहक, चालक, मेकॅनिक, क्लार्क आदी कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.
– गोपाळ शिंदे, चालक, स्वारगेट आगार
खासगी वाहनांवर नियंत्रण कोणाचे?
कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धुळे, मुंबई, ठाणे, बोरिवली या लांब पल्ल्याच्या मार्गावर बसेस धावत आहेत. मात्र, पुणे जिल्ह्यातील मार्गांवर प्रवास करण्यासाठी नागरिकांची गैरसोय होत आहे. नागरिकांना कात्रज, धायरी फाटा, येरवडा, हडपसर आदी उपनगरांतून वडाप, व्हॅन, रिक्षा आदी खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. परंतु, यामध्ये बहुतांश वेळा क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक होत असून, या वाहनांवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे चित्र आहे.
चित्र “जैसे थे’
पंधरा दिवसांपासून फलाटांवर उभी असणारी खासगी वाहने, स्थानकाच्या आवारातील पोलीस बंदोबस्त, प्रवासी आपल्याच बसमधून यावेत यासाठी वाहनचालकांचे प्रयत्न, नियंत्रण कक्ष बंद असल्याने प्रवाशांत संभ्रम आणि अतिरिक्त प्रवास भाड्याची वसुली असे चित्र सध्या आहे.