डिसेंबरमध्ये निवडणूक जाहीर होण्याची शक्यता : पृथ्वीराज जाचक यांच्या भूमिकेकडे लक्ष
गोकुळ टांकसाळे
भवानीनगर – इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची हवा अवकाळी पावसाच्या वातावरणातही तापली आहे. डिसेंबर महिन्यात निवडणूक प्रक्रिया जाहीर होणार असल्याने इंदापूरच्या शिवारात निवडणुकांचे वेध लागले आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी लासुर्णे येथे (दि.25) येथे समविचारी पक्षांशी विचारविनिमय करण्यासाठी बैठक बोलविली आहे. त्यामुळे कारखान्याच्या धुराडेप्रमाणे निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे.
भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी कारखाना हा बारामती आणि इंदापूरच्या सीमेवरील आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकारणातील एंट्री ही सहकाराच्या माध्यमातून छत्रपती कारखान्यातून झाली होती. त्याचबरोबर बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची राजकीय वाटचाल श्री छत्रपती कारखान्यातून झाली आहे. हा कारखाना राजकीय नेतृत्व घडविणारा म्हणून ओळख आहे.
गेल्या दहा ते बारा वर्षांपासून सहकाराच्या शिवारात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. कारखान्यावरील कर्जाचा डोंगर, कामगार भरती आदी कारणांमुळे चर्चेत आला आहे. ऊस दराचा मुद्दा दरवर्षी चर्चेत आहे. वर्षांपासून कारखान्याची अर्थकुंडली बिघडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साखर संघाचे माजी अध्यक्ष जाचक यांना कारखान्यात लक्ष देण्याची सूचना केली होती. त्यानंतर जाचक यांनी लक्ष दिले. मात्र, या कालावधीत सत्ताधारी संचालक आणि जाचक यांच्यात फारसे सलोख्याचे संबंध राहिले नाहीत.
संचालक मंडळाच्या बैठकीत जाचकांना नो एंट्रीचा ठराव केला. त्यामुळे जुळत आलेले संबंध पुन्हा ताणले गेले आहेत. पृथ्वीराज जाचक हे सहकारातील अभ्यासू आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांच्यावर कारखान्याची घडी सुधारावी, यासाठी जबाबदारी सोपविली होती. मात्र, तिथेही संचालकांनी त्यांना जुमानले नाही.
डिसेंबर महिन्यात छत्रपती कारखान्याची निवडणूूक होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील दिशा ठरवण्यासाठी पृथ्वीराज जाचक यांनी समविचारी सहकाऱ्यांची विचारविनिमय करण्यासाठी बैठक बोलावली आहे. शेतकरी कृती समितीचे बाळासाहेब कोळेकर, शिवाजी निंबाळकर यांनी लासुर्णे येथील कुणाल ऑटोलाइन्स येथे (दि.25) ही बैठक आयोजित केली आहे. बैठकीत कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक हे सर्वांशी चर्चा करून कोणती भूमिका जाहीर करतात, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
वास्तव प्रश्नांवर भर
जाचक यांनी गेल्या पाच वर्षांत कारखान्यामधील चर्चेतील आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न जाहीरपणे मांडले आहेत. यावर सत्ताधाऱ्यांनी संयमाने परिस्थिती आणि वास्तव मांडले. या कालावधीत कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी कारखान्याची सद्यस्थिती शेतकऱ्यांना समजावून सांगून लवकरच कारखान्याची घडी सुधारेल, असे शेतकऱ्यांना आश्वस्त केले आहे. यावेळी जाचक यांनी आखाड्यात उतरण्याची घोषणा केल्यास सत्ताधारी गटाला अडचणीचे ठरू शकते.