पुणे – महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र आली असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्ष अंतिम प्रभागरचना केवळ राष्ट्रवादीच्या पथ्थ्यावर पडली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत प्रभागरचनेचा “खडा’ पडला असून हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने बंडाचा झेंडा फडकविण्यास सुरुवात करत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक असताना तसेच दोनवेळा शिवसेनेचा आमदार, एकवेळा खासदार असतानाही या मतदारसंघात केवळ राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसाठी अनुकूल प्रभागरचना करण्यात आली असल्याचा दावा करत शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी राष्ट्रवादीसोबत वेळप्रसंगी मैत्रीपूर्ण लढत केली जाईल, असे सांगत बंडाचे निशाण फडकवले आहे.
महापालिका निवडणुकांमध्ये पुण्यातील सत्ताधारी भाजपला पायउतार करण्यासाठी राष्ट्रवादी, कॉंग्रेस तसेच शिवसेना एकत्र येत महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचे वारंवार तीनही पक्षाचे नेते सांगत आहेत. तसेच जागावाटपाबाबत या पक्षांनी एकमेकांसमोर प्राथमिक चर्चेत प्रस्तावही सादर केले आहेत. त्यात, विद्यमान नगरसेवकांची उमेदवारी कायम ठेवत, मागील निवडणुकीत ज्या पक्षाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकाला असेल त्याला ती जागा दिली जाईल, असा फॉर्म्युला मांडण्यात आला. मात्र, त्यानंतर प्रत्यक्षात प्रभागरचनेत हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेलाच धक्का देत केवळ राष्ट्रवादीला साजेशी प्रभागरचना केली असल्याचा दावा केला जात आहे. त्यासाठी स्थानिक आमदार तसेच राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी हस्तक्षेप करून ही खेळी केली असल्याचा दावा भानगिरे यांच्यासह माजी शिवसैनिक करत आहेत. त्यामुळे, हडपसर आणि परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला असून आम्ही वेळप्रसंगी राष्ट्रवादीच्या समोरून लढू असा इशारा भानगिरे यांनी दिला आहे.
कॉंग्रेसलाही बसला फटका
एका बाजूला शिवसेनेच्या नगरसेवकांकडून नाराजी व्यक्त केली असतानाच कॉंग्रेसचे माजी गटनेते आबा बागूल यांनीही प्रभागरचनेवर आपेक्ष घेतला आहे. आपल्या जुन्या प्रभागातील एक पाण्याचा शुद्धीकरण प्रकल्प आपल्या प्रभागात यावा यासाठी एका नगरसेवकाने पुढाकार घेत उद्यानाचे दोन तुकडे करणारी प्रभागरचना केली असल्याचा आरोप बागूल यांनी राष्ट्रवादीचे नाव न घेता केला आहे. तळजाई टेकडीवर या प्रकल्पातून पाणी जाते त्यामुळे तळजाई टेकडीच्या भागातील या नगरसेवकाने हस्तक्षेप करून हा प्रकल्प आपल्या प्रभागात घेतला आहे. तसेच या प्रकल्पाचे श्रेय घेण्यासाठी हा खटाटोप सुरू असून याला मतदारच उत्तर देतील, असा इशारा बागूल यांनी दिला आहे.
आयारामही नाराज
महापालिकेची निवडणूक 3 सदस्यांच्या प्रभागात होणार असल्याने 2017 मध्ये ज्या प्रभागात भाजपचे चार नगरसेवक होते. त्या ठिकाणी एका उमेदवाराची अडचण झाली आहे. अशा स्थितीत अशा 15 उमेदवारांवर राष्ट्रवादीने गळ टाकलेला होत. तसेच प्रभागरचना अनुकूल करण्याचे आमिष दाखवित राष्ट्रवादीत डेरे दाखल होण्याची विनंती केली होती. मात्र, प्रत्यक्षात राष्ट्रवादी आणि भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांच्या प्रभागातच बदल झाले असून काठावर प्रभागरचना बदलण्याची वाट पाहणाऱ्या आयारामांना हाती काही लागलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून दगाफटका झाला असल्याचे सांगत राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेले आयारामही नाराज झाले आहेत.