पुणे –महापालिकेच्या शहरी गरीब योजनेच्या नवीन विस्तारीत इमारतीमधील कार्यालयात अखेर नागरिकांना बसण्यासाठी लाकडी टेबल तसेच उन्हापासून बचावासाठी छत्र्या बसविण्यात आल्या आहेत. मात्र, कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कारभार अद्याप सुधारण्यास तयार नाही. विशेष बाब म्हणजे नागरिकांच्या तक्रारी येत असल्याने या कार्यालयाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या सहायक आयोग्य प्रमुख डॉ. मनिषा नाईक यांच्यासमोरच या ठिकाणी होत असलेल्या अडचणींचा पाढा नागरिकांनी वाचला. त्यानंतर, डॉ. नाईक कार्यालयात जाऊन कागदपत्रांची पाहणी करून कोणत्याही सूचना न करताच तिथून निघून गेल्याचे पहायला मिळाले.
शहरातील आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांसाठी महापालिकेकडून शहरी गरीब योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत 1 लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या कुटुंबाला 2 लाखांपर्यंतचे वैद्यकीय उपचार दिले जातात. या योजनेचे सभासदस्त्व नुतनीकरण तसेच उपचाराचे पत्र देण्यासाठी महापालिकेच्या विस्तारीत इमारतीच्या तळमजल्यावर कार्यालय सुरू केले आहे. मात्र, या कार्यालयातील कर्मचारी सकाळी वेळेवर येत नसल्याने तसेच नागरिकांशी योग्य पद्धतीने वागत नसल्याने या केंद्राबाबत तक्रारी आहेत. .
याशिवाय, या केंद्रात आलेल्या नागरिकांना भर उन्हात रांगेत उभे राहवे लागत असून बसण्यासाठी काहीच सुविधा नाही. ही बाब दैनिक “प्रभात’ने वृत्ताद्वारे समोर आणल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून या केंद्राच्या ठिकाणी मोठ्या छत्र्या लावण्यात आल्या आहेत. तसेच बसण्यासाठी बाके आणि खुर्च्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
रांगेतून काढले बाजूला…
नागरिकांना उन्हापासून संरक्षणाच्या सुविधा देण्यात आल्या असल्या तरी या केंद्रावर कारभार सुधारत नसल्याचे चित्र आहे. सहायक आरोग्य प्रमुख डॉ. नाईक या ठिकाणी आल्या तेव्हा नागरिकांनी तक्रारींचा पाढाच वाचला. एक नागरिक कार्डचे नुतनीकरणासाठी दोन तास रांगेत थांबला. त्यानंतर जेवणाची सुट्टी झाली. कर्मचारी पुन्हा परत आल्यानंतर या नागरिकाचा क्रमांक आल्यावर त्याकडे महापालिकेची गवनी शुल्काची थकबाकी असल्याने त्याला रांगेतून बाजूला काढण्यात आले. त्यामुळे आधीच का कागदपत्रांची माहिती देण्यात येत नाही, असा सवाल या नागरिकांनी डॉ. नाईक यांना केला. त्यांनी हेच नियम असून तुम्ही आरोग्य प्रमुखांना विचारा, असे त्यांना सुनावले. त्यानंतर एका वयस्कर आजी आपल्या नातीच्या उपचारासाठी पत्र घेण्यास आल्या होत्या. त्यांना वाचता येत नसले तरी त्यांनी सर्व कागदपत्रे आणली होती. मात्र, त्यांना मागितलेला कागद नेमका कोणता हे समजत नसल्याने त्यांना रांगेतून बाजूला काढले. डॉ. नाईक यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांना एका कर्मचाऱ्याने ज्येष्ठ नागरिकांच्या खिडकीकडे जाऊन संबंधित महिलेची कागदपत्रे जमा करून घेतली.