पुणे –महापालिकेने पावसाळ्याआधी नालेसफाई तसेच विविध कामांच्या निविदा काढण्याची मान्यता दिली आहे. सुमारे रमान्यता दिली आहे. या निविदा तब्बल 35 ते 42 टक्क्यांपर्यंत कमी दराने आल्या आहेत. त्यामुळे पालिकेने निश्चित केलेल्या खर्चाच्या अंदाजापेक्षा 40 टक्के कमी रक्कम घेऊन नालेसफाई केली जाणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
प्रशासनाने यापूर्वीही 40 ते 60 टक्क्यांपर्यंत कमी दरांच्या निविदांना मंजुरी दिली. मात्र, त्यानंतर पावसाळ्यात तुंबलेल्या नाल्यांमुळे भीषण परिस्थिती उद्भवली. त्यामुळे नक्की नालेसफाई झाली होती का? असा प्रश्न विचारण्याची वेळ पुणेकरांवर आली होती. त्याचीच पुनरावृत्ती यंदाही होत असून, या निविदांमध्येही “रिंग’ झाल्याची शक्यता आहे. मंगळवारी काढलेल्या निविदांमध्ये नालेसफाईच्या सुमारे 13, तर पावसाळी कामांच्या 15 निविदा मंजूर करण्यात आलेल्या आहेत.
केवळ भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाची निविदावगळता इतर 14 निविदा आयुक्तांनी मंजूर केल्या आहेत. या सर्व निविदा सरासरी 60 लाख ते सव्वा कोटी रुपयांपर्यंतच्या होत्या.
विशेष म्हणजे, पालिकेने या कामांसाठी शासनाने निश्चित केलेल्या “डीएसआर’नुसार, पूर्वगणक पत्र तयार करून निविदा काढल्या होत्या. मात्र, भवानी पेठवगळता इतर सर्व निविदा 35 ते 42 टक्केपर्यंत कमी दराच्या आलेल्या आहेत. तर भवानीपेठेची निविदा 10 टक्के कमी दाराने आली आहे. त्यामुळे आयुक्तांनी इतर सर्व निविदा मंजूर केल्या आहेत.
खरंच कामे होणार का?
पावसाळ्याच्या नावाखाली ही नालेसफाई आणि पावसाळी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तरी प्रत्यक्षात ठेकेदारांकडून निविदा दरांपेक्षा 40 टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे ठेकेदार कोणताही नफा न स्वीकारता पदरमोड करून पुणेकरांसाठी हे काम करणार का? असा सवाल आहे. तर 40 टक्के कमी खर्चातही ही कामे होत असताना महापालिकेचे पूर्वगणक पत्र चुकीचे असून विनाकारण महापालिका जादा रकमेच्या निविदा काढत आहे का? असा प्रश्नही उपस्थित होतो. प्रत्यक्षात प्रशासनाकडे नाले सफाईसाठी दीड महिन्यांचा कालावधी असून मेअखेर शहरात मान्सूनपूर्व पावसाने नाल्यांमधील गाळ तसेच कचरा वाहून जातो. त्यामुळे प्रत्यक्षात काही ठिकाणी काम करून उर्वरित काम ठेकेदार या पावसावर सोडून देत असल्याचे चित्र आहे.