पुणे –लॉकडाऊन आणि दुर्लक्षामुळे क्षयरोगाचे रुग्ण वाढले आहेत. परंतु, मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी नव्याने लागण झालेल्यांची नोंदणीच कमी करण्यात आली आहे. याशिवाय, करोना बाधितांपेक्षा क्षयरोग बाधित मृत्यूची टक्केवारी अधिक असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.
मागील वर्षापासून करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याला सुरुवात झाली तेव्हा क्षयरोगाची नोंदणी 30 टक्क्यांनी कमी झाली आहे. परंतु, जेवढी नोंदणी झाली आहे, त्यामध्ये “एमडीआर-टीबी’ (मल्टीड्रग रेजिस्टंट टीबी)चा दर चार टक्क्यांवरून पाच टक्के झाला आहे. 2019 मध्ये तो 4 टक्के होता. तर 0.29 टक्के दर हा “एक्सडीआर-टीबी’ (एक्स्टेन्सिव्हली ड्रग रेजिस्टंट टीबी)चा आहे.
करोना प्रादुर्भाव सुरू होण्याआधी म्हणजे 2019 मध्ये 2.27 लाख क्षयरोग्यांची नोंदणी झाली होती. मात्र, 2020 नंतर केवळ 1.60 लाख प्रकरणे नोंदवली गेली. साथीचा आजार, पायाभूत सुविधांवरील ताण, मनुष्यबळाचा अभाव त्यामुळे अन्य रोगांप्रमाणे या रोगांच्या उपाययोजनांकडेही दुर्लक्ष झाले आहे. गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच आधीच्या वर्षीपेक्षा कमी संख्या नोंदवली गेली आहे.
साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण आरोग्य यंत्रणा करोनाच्या उपाययोजनांच्या मागे होती. अहवाल, संपर्क, ट्रेसिंग, उपचार, बेड व्यवस्थापन, लसीकरण या सगळ्यामुळे अन्य रोगांच्या अहवालावर आणि नोंदणीवर परिणाम झाला. त्यामध्ये क्षयरोगाचा समावेश होता.
कुटुंबात संसर्ग पसरण्याचा धोका
करोनामुळे क्षयरोग्यांच्या नोंदणीवर परिणाम झाला ही वस्तुस्थिती आहे. तसेच क्षयरोगाच्या “एमडीआर’ आणि “एक्सडीआर’ प्रकारात वाढ झाली आहे, ही चिंतेची बाब आहे. याचा संसर्ग वाढळा तर रुग्णासाठी उपचार करणे कठीण होऊ शकते, याशिवाय कुटुंबात संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. करोनाच्या आधी संसर्गजन्य रोगांमध्ये क्षयरोग होऊन मृत्यू पावण्याचे प्रमाण जास्त होते. आता करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून, क्षयरोग आणि अन्य संसर्गजन्य रोगांकडे आता पुन्हा लक्ष द्यावे लागणार आहे. 2020 मध्ये क्षयरोगामुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण राज्यात पहिल्या किंवा दुसऱ्या लाटेत करोनामुळे नोंदवलेल्या आकडेवारीपेक्षा सुमारे 4.36 टक्क्याने जास्त होते, असे राज्याचे साथरोग नियंत्रण विभागप्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.