पुणे – नियोजित वेळेपेक्षा केरळ येथे दोन दिवस उशिरा दाखल झालेल्या मान्सूनची गेल्या दोन दिवसापासून घोडदौड सुरू आहे. अतिशय वेगाने पुढे सरकत नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी केवळ दोनच दिवसात महाराष्ट्रापर्यंत मजल मारली असून, राज्याच्या किनारी भागातून दाखल झालेला मान्सून आता पुण्याच्या उंबरठ्यावर पोहचला आहे.
अंदमान येथे 29 मे रोजी दाखल झालेला मान्सूनचा प्रवास केरळकडे सरकताना निर्माण झालेल्या अडचणीमुळे काहीसा रेंगाळला होता. त्यामुळेच एक जून ऐवजी दोन दिवस उशिरा म्हणजेच तीन जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला.
मात्र केरळ मध्ये दाखल झाल्यानंतर अतिशय वेगाने पुढे सरकरत पहिल्या चोवीस तासात मान्सूनने कर्नाटकातील कारवारपर्यंतचा भाग व्यापला. त्यानंतर अवघ्या काही तासांतच तळकोकणमार्गे महाराष्ट्रात प्रवेश करत, थेट पुणे आणि मुंबई शहराच्या उंबरठ्यावर पाऊस आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सिंधूदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे.
नियोजित वेळेपेक्षा दोन दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून, पुढील काही तासात मान्सून राज्यातील आणखी काही भाग तसेच कर्नाटक, तेलंगणा व्यापण्याची शक्यता आहे.” मात्र सात जून ते 11 जूनपर्यंत राज्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने सात दिवसांसाठी मान्सूनचा पुढील प्रवास रेंगाळेल, असा अंदाज विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.
पुणे-मुंबईच्या उंबरठ्यावर
एखाद्या ठिकाणी लागोपाठ दोन दिवस पडलेला पाऊस, पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव आणि पावसाचे ढग ही स्थिती लक्षात घेत, त्याठिकाणी मान्सून दाखल झाला असल्याची घोषणा केली जाते. पुण्यात गेल्या दोन दिवसापसून सातत्याने पाऊस पडत आहे.
तसेच शनिवारी (दि. 5) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे 3 मिमी आणि लोहगाव येथे 34.1 मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. शहरातील हवामानाची एकूण स्थिती पाहता, मान्सूनसाठी अनुकूल स्थिती शहरात तयार झाली असून, पुढील चोवीस तासात मान्सूनबाबत विभागातर्फे अधिकृत घोषणा करण्यात येईल. मुंबईतदेखील अशीच परिस्थिती असल्याचेही विभागातर्फे सांगण्यात आले आहे.