मराठी अध्यासन उभारणीसाठी महाराष्ट्रातून पुढाकार नाही
कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडित यांनी व्यक्त केली खंत
पुणे – जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील भारतीय भाषा प्रशालेत तामीळ, कन्नड, उडिया वगैरे भाषांसाठी संबंधित राज्यांच्या सरकारांनी अध्यासनांना देणगी दिली आहे. ऊर्दू अध्यासनासाठीही निधी मिळाला आहे. मात्र, मराठी भाषेच्या अध्यासनासाठी महाराष्ट्रातून अजूनही कोणीच पुढाकार घेतला नाही, अशी खंत “जेएनयू’च्या कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडित यांनी व्यक्त केली.
“जेएनयू’च्या कुलगुरूपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. पंडित यांचा माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. एस. के. जैन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आयोजक एकता मासिकाचे संपादक मनोहर कुलकर्णी, रवींद्र घाटपांडे या वेळी उपस्थित होते.
“नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, भारतीय भाषांचे अध्यासन स्थापन करण्यात येणार आहे. मात्र, महाराष्ट्राकडून अद्याप मराठी भाषा अध्यासनासाठी प्रस्ताव आला नाही, असे डॉ. पंडित म्हणाल्या. त्यावर व्यासपीठावरील मान्यवरांनी थेट जेएनयूच्या कुलगुरूपदीच पाठविले, अशी टिप्पणी केली. डॉ. पंडित यांनी “मला राज्याने नव्हे, संघाने पाठवले’, असे विधान केले. “जेएनयू’ने आताच्या सरकारला तीन केंद्रीय मंत्री दिले आहेत. 60 टक्के आयएएस व आयपीएस अधिकारी माजी विद्यार्थी आहेत. त्यामुळे पाच टक्के वेड्यांवर जेएनयूचे मूल्यमापन करू नका.
एकाच घराण्याचा इतिहास…
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आधुनिक भारताचा इतिहास हा आतापर्यंत एका कुटुंबाचा इतिहास म्हणून शिकविला गेला. गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, आगरकर, वीर सावरकर यांच्यासारख्या दक्षिणेतील स्वातंत्र्यसेनानींचा इतिहास शिकविलाच गेला नाही. त्यामुळे अभ्यास न करताच त्यांच्यावर टीका होणे, अतिशय दुर्दैवी आहे, अशी खंत डॉ. शांतिश्री पंडित यांनी व्यक्त केली.