पुणे – नद्यांच्या दयनीय स्थितीबाबत शहरातील दोनशे नागरिकांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कार्यालयांना पत्र दिले आहेत. यामध्ये नद्यांची सद्य परिस्थिती, त्यावरील अतिक्रमणांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील नद्यांच्या भीषण स्थितीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातील नागरिकांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये उपोषण केले होते. त्याला ७०० दिवस पूर्ण झाले आहेत. त्या निमित्ताने हा पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
२७ फेब्रुवारी २०२२ रोजी हे आंदोलन सुरू करण्यात आले होते. नुकतेच आम्ही या आंदोलनाचे ७०० दिवस पूर्ण केले. आंदोलनात सहभागी झालेल्या १२ जणांचा या वेळी सत्कार करण्यात आला. नरेंद्र खोत या नागरिकाने ८५ वेळा उपवास केले आहेत, अशी माहिती उपोषण आंदोलनातील सहभागी आणि समन्वयक मुकुंद मावळणकर यांनी दिली.
उपोषणात सहभागी झालेल्यांची छायाचित्रे, तसेच त्याचे एक टेम्प्लेट तयार करून त्याचाही समावेश पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेल्या पत्रांमध्ये केला आहे. गेल्या दोन वर्षांत ५०० हून अधिक इमेल सरकारला पाठवण्यात आले आहेत, असे मावळणकर म्हणाले. पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या कामावर नियंत्रण ठेवणे ही आमची जबाबदारी आहे, असे मत गुंतवणूक सल्लागार आणि चळवळीत सहभागी श्रीयुष ओसवाल यांनी व्यक्त केले.
मी ८२ वेळा उपोषण करून अधिकाऱ्यांना ईमेल देखील केला आहे. आतापर्यंत त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसून, मी नद्यांसाठी उपोषण करत आहे. नद्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधून त्यांचे जतन करावे, अशी आमची मागणी असल्याचे चारुथा पालसोडकर म्हणाल्या.