पुणे – महापालिकेकडून तब्बल 2515 कोटी रुपयांचा खर्च करून पुणेकरांसाठी समान पाणी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत महापालिका जवळपास 1600 किलोमीटरच्या जलवाहिन्या बदलणार येत असली तरी प्रत्यक्षात मात्र, जवळपास 80 किलोमीटरच्या मुख्य ट्रान्समिशन लाइन (जलवाहिन्या) जुन्याच ठेवण्यात आल्या आहेत. या लाइन जवळपास 40 ते 50 वर्षे जुन्या असतानाही त्या बदलण्यात येणार नसल्याने यातूून होणारी गळती महापालिकेसाठी डोकेदुखी ठरणार आहे. ही गळती शोधण्यासाठी आणि रोखण्यासाठी महापालिकेस पुन्हा स्वतंत्र खर्च करावा लागत आहे. त्यामुळे, मुख्य वाहिन्या का वगळण्यात आल्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रस्त्याखाली गाडल्या गेल्याने….
महापालिकेने समान पाणी योजना राबविताना शहरातील जुन्या जलवाहिन्यांमध्ये सुमारे 35 टक्के पाणीगळती होत असल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार, या योजनेत तब्बल 1600 कि.मी.च्या जलवाहिन्या बदलण्यात येणार असून 450 कि.मी.च्या जुन्या जलवाहिन्या तशाच ठेवण्यात येणार आहेत. यातील अनेक जलवाहिन्या गेल्या दहा वर्षांपेक्षा जुन्या आहेत. मात्र, मुख्य जलवाहिन्या 40 ते 50 वर्षे जुन्या असून त्या वनविभाग, लष्कर, अनेक रस्त्यांच्या खाली गाडलेल्या आहेत. त्यामुळे त्या बदलता येणार नसल्याचे कारण देत प्रशासनाने या जुन्या जलवाहिन्या वगळण्यात आल्याचे सांगितले.
80 कि.मी.मध्येच सर्वाधिक गळती…
महापालिकेने समान पाणी योजनेत पाण्याचे झोन केले आहेत. प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र जलवाहिन्या असून त्या मुख्य ट्रान्समीशन लाइनला जोडल्या आहेत. जलकेंद्रातून तसेच टाक्यांमधून पाणी सोडले जाते. महापालिकेने हे काम करताना या वाहिन्यांच्या सुरूवातीला आणि शेवटी फ्लो मीटर बसविण्यात आले आहेत. परिणामी, किती पाणी सोडले आणि किती प्रत्यक्षात झोन पर्यंत पोहचत आहे, हे निश्चित होते.
त्यामुळे महापालिकेस गळती सापडण्यास सुरूवात झाली असून आतापर्यंत दरदिवशी सात कोटी लिटरची गळती जुन्या वाहिन्यांमध्ये होत असल्याचे समोर आले आहे. पालिकेने या 80 कि.मी.च्या जलवाहिन्यांची तापसणी सुरू केली असून प्रत्येक किलोमीटरला 3 ते 4 लाखांचा खर्च येत आहे. या शिवाय, गळती सापडली तरी ती जलवाहिनी शोधून ती दुरूस्त केली जात आहे. मात्र, या जलवाहिन्या 600 ते 1600 मिमी व्यासाच्या आहेत. एका ठिकाणी दुरूस्ती केल्यास लगेच दुसऱ्या ठिकाणी गळती होत आहे.