पिंपरी – लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघा एक महिना बाकी राहिला आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. कंपन्या, दुकाने आणि घरोघरी जाऊन कार्यकर्ते वर्गणी गोळा करत आहेत. मात्र ही वर्गणी गोळा करताना कोणावरही जबरदस्ती करू नका, असा सल्ला पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दै. “प्रभात’शी बोलताना गणेशोत्सव मंडळांना दिला आहे. नागरिकांच्या तक्रारी आल्यास गुन्हे दाखल करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
करोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. दुकानदाराचा व्यवसाय डबघाईला आला होता. त्यामुळे शहरातील काही मंडळांनी वर्गणीच गोळा केली नव्हती. आता मात्र घडी पूर्वपदावर येऊन दोन वर्ष उलटली आहेत. दोन वर्ष वर्गणी वाढ न केल्याने यंदाच्या वर्षी काही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वर्गणी वाढवून द्यावी, यासाठी व्यापारी व दुकानदार यांच्याकडे आग्रही मागणी केली आहे. तर दुसरीकडे गेल्या वर्षी इतकी किंवा त्यापेक्षा कमी वर्गणी घ्यावी, अशी भूमिका व्यापारी वर्गातून मांडण्यात येत आहे.
गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी व्यापारी देतील तेवढीच वर्गणी घ्यावी. वर्गणीसाठी कोणावरही जबरदस्ती करू नये, वर्गणी बाबत जबरदस्ती केल्यास आणि याबाबत तक्रार आल्यास संबंधित मंडळांवर गुन्हा दाखल केला जाईल.
विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त-पिंपरी चिंचवड
वर्गणी हा केवळ गणेशोत्सवापुरता विषय मर्यादित राहिलेला नाही. दहीहंडी, नवरात्री तसेच महापुरूषांच्या जयंतीसाठीही वर्गणी द्यावी लागते. आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातील नागरिकांकडून वर्गणी घ्यावी. केवळ एमआयडीसीमध्ये कंपन्या आहेत म्हणून आमच्याकडे येऊ नका. आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणीही वर्गणी द्यावी लागते. लघुउद्योजक देतील तेवढी वर्गणी घ्यावी. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाच हजार आणि दहा हजारांसाठी आग्रह करू नये.
– संदीप बेलसरे, अध्यक्ष-पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना