पुणे – देशाचे दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी सर्व समाजघटकांच्या उन्नतीसाठी कार्य केले. त्यांच्या प्रेरणेतून श्रमिक पत्रकारांच्या घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करेन, अशी ग्वाही राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली.
भारतीय जनता पक्षाच्या कसबा विधानसभा मतदार संघातर्फे अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त नवी पेठेतील पुणे श्रमिक पत्रकार संघात पत्रकारांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, भाजपच्या कसबा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे यांच्यासह पक्षाचे कसबा विधानसभा मतदार संघातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी चंद्रकांत पाटील यांनी अटलजींच्या विविध आठवणींना उजाळा दिला. अटलजींची नाळ ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेली होती. साधी राहणी हा त्यांचा स्थायी भाव होता. या निखळ व्यक्तित्वाने राजकारणात आत्मीयता आणि प्रेम टिकवण्याची सदैव दक्षता घेतली. जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीनदयाळ उपाध्याय यांनी समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी मांडलेला विचार अटलजींनी पुढे नेला, असे पाटील म्हणाले.
अटलजींच्या विचारांच्याच प्रेरणेतून श्रमिक पत्रकार आणि वकिलांना त्यांच्या कारकिर्दीच्या प्रारंभीच्या उमेदीच्या वर्षात म्हणजे किमान पाच वर्षे तरी पुरेसे मानधन देण्याची व्यवस्था सरकारने केली पाहिजे, यासाठी मी आग्रही आहे, तसेच पत्रकारांना हक्काचे घरकुल मिळाले पाहिजे, यासाठी जागा मिळवण्यासह बांधकाम खर्चात योगदान देण्यासाठी राज्य सरकार आणि समाजाच्या स्तरावर प्रयत्न करेन, अशी घोषणा पाटील यांनी केली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या खजिनदार अंजली खमितकर यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. चिटणीस पूनम काटे यांनी आभार मानले.