– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना आव्हान
– अटल संस्कृती गाैरव पुरस्करांनी मान्यवरांचा गौरव
पुणे – राम मंदिर वही बनायेंगे, लेकीन तारीख नही बतायेंगे, असे म्हणणाऱ्यांना उत्तर देत अयोध्येत राममंदिर उभे राहिले आहे आणि त्याच ठिकाणी ते उभे राहिले आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी पूर्ण केले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पुण्यात केले. हे सांगतानाच, राममंदिर भाजपची खासगी मालमत्ता आहे का? असा सवाल करणार्या उद्धव ठाकरे यांना आता मंदिर उभे राहिले आहे, हिंमत असेल तर अयोध्येत या, असे आव्हान फडणवीस यांनी नाव न घेता दिले.
संस्कृती प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा अटल संस्कृती गाैरव पुरस्कार फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला. ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे (२०२२ चा) आणि उद्याेगपती प्रमाेद चाैधरी (२०२३ चा)यांना हा पुरस्कार देण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, एक लाख रुपये धनादेश असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. रघुनाथ माशेलकर, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, डाॅ. शां. ब. मुजुमदार, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि माजी महापाैर मुरलीधर माेहाेळ उपस्थित हाेते.
अटलजींच्या व्यक्तीत्त्वाविषयी बोलताना अटलजींच्या कविता फडणवीस यांनी उधृत केल्या. अटलजी हे नावाप्रमाणेच अटल हाेते. अणुस्फाेट करताना त्यांनी जगाचा दबाव झुगारला. देशावर निर्बंध लागल्यानंतरही ते अटल राहिले. पुढे अनेक देशांनी हळूहळू निर्बंध कमी केले, अशी आठवण फडणवीस यांनी सांगितली.
अटलजी हे द्रष्टे नेते
भाजपच्या अजेंड्यामध्ये ३७० कलम आणि राममंदिर नसल्याबद्दल विरोधकांनी अटलजींना घेरले. त्यावेळी बावीस पक्षांचे एकत्रित सरकार चालवत असताना या गोष्टी करता आल्या नाहीत. परंतु ज्यावेळी माझ्या पक्षाचे एकहाती सरकार आल्यानंतर ते होईलच असा विश्वास अटलजींनी त्यावेळी दर्शवला होता. त्यांचा द्रष्टेपणा त्यातून दिसला. आज भाजपचे सरकार आले, राममंदिरही उभारले आणि ३७० कलम रद्दही झाले, असे फडणवीस म्हणाले.