पुणे – खडकवासला प्रकल्पातून ग्रामीण भागातील शेतीसाठी पहिल्या रब्बी आवर्तनाला सोमवारपासून (दि.२७) सुरुवात झाली आहे. खडकवासला धरणातून कालव्याद्वारे हे आर्वतन सोडले जात आहे. हे आर्वतन सुमारे ५.५ टीएमसीचे असणार असून पुढील सुमारे ६० दिवस हे आर्वतन सुरु राहणार आहे.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार सोमवारपासून हे आर्वतन सोडण्यास सुरुवात झाली आहे. यंदा अपुरा पडलेला पाऊस यामुळे धरणे जेमतेम भरली. तसेच परतीच्या पावसाने फिरवलेली पाठ यामुळे यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई भासण्याची दाट शक्यता आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांत मिळून एकूण २५.७३ टीएमसी, म्हणजेच ८८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. रब्बीचे पहिले आर्वतनाद्वारे ५.५ टीएमसीचे असणार आहे. या आर्वतनामुळे दौंड, इंदापूर, हवेली या तालुक्यातील शेतीला फायदा होणार आहे. तसेच नागरिकांची पिण्याच्या पाण्याची देखील सोय होणार आहे.