पुणे – मालवाहतूकदारांनी पुकारलेल्या संपामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली होती. पुणे, मुंबईसह राज्यातील प्रमुख बाजार आवारात मागणीच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक मागणीच्या तुलनेत २० ते २५ टक्के झाली होती. मंगळवारी रात्री संप मागे बाजारात भाजीपाल्याची आवक सुरू झाली असून, भाजीपाल्याची आवक गुरुवारपासून सुरळीत होईल.
मुंबई बाजार समिती, पुण्यातील मार्केट यार्डासह राज्यातील प्रमुख बाजार आवारात परराज्यातून मटार, बटाटा, गाजर, हिरवी मिरचीची मोठ्या प्रमाणावर आवक होते. मालवाहतूकदारांना पुकारलेल्या संपामुळे परराज्यातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक कमी झाली होती. मालवाहतूकदारांनी संप मागे घेतल्यानंतर बाजार आवारात राज्य तसेच परराज्यांतून भाजीपाल्याची आवक सुरू झाली आहे, असे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डाॅ. राजाराम धोंडकर यांनी सांगितले.
संपामुळे हिरवी मिरची, मटार, गाजर या भाज्यांची आवक कमी प्रमाणावर झाली होती. परराज्यांतून होणारी आवक कमी झाली असली तरी पुणे विभागातील शेतकऱ्यांकडून आवक सुरळीत सुरू आहे. मालवाहतूकदारांनी संप मागे घेतल्यानंतर गुरुवारपासून (४ जानेवारी) भाजीपाल्याची आवक सुरू असेल, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील प्रमुख आडते विलास भुजबळ यांनी सांगितले.
भाव कडाडले
सध्या थंडीमुळे भाज्यांची तोडणी कमी होत आहे. त्यामुळे मटार, गाजर, टोमॅटोवगळता अन्य भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. यात बहुतांश भाज्यांचे भाव १२० ते १४० रुपये किलो दरम्यान आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला फटका बसला आहे. त्यात मालवाहतूकदारांच्या संपानेही मोठा प्रभाव निर्माण झाला आहे.