बिबवेवाडी – उपनगरांतील पाणीटंचाई तसेच कमी दाबाच्या पाणीप्रश्नी क्षेत्रीय कार्यालयातील तक्रारी वाढत आहेत. यावर पर्याय काढण्याऐवजी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडून समान पाणीपुरवठा योजनेची “कॅसेट’ वाजविली जात आहे. या योजनेनुसार सर्वांना समान पाणी मिळेल, असा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात असला तरी ही योजना राबविताना उपनगरात राजकीय आशीर्वादातून देण्यात आलेले बेकायदा नळजोड काढणार की ठेवणार? या प्रश्नाचे उत्तर मात्र पाणीपुरवठा विभागाकडे नाही, त्यामुळे ही योजना कागदोपत्रीच यशस्वी ठरणार अशी चर्चा आहे.
शहर तसेच उपनगरांतील पाणीप्रश्नांवर समान पाणीपुरवठा योजना राबविली जाणार आहे. यातून पाणीगळती तसेच चोरी रोखण्याबरोबरच पुरवठ्यातील विस्कळीतपणा रोखला जाणार असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु, राजकीय पुढाऱ्यांनी त्यांच्या-त्यांच्या परिसरात जवळ’च्या लोकांना बेकायदा नळजोड दिले आहेत. गेल्या काही वर्षांत अशा नळजोडची संख्या मोठी आहे. बेकायदा असल्याने याबाबतची कुठलीच माहिती पाणीपुरवठा विभागाकडे नाही. शिवाय अशा नळजोडांबाबत कोणाचेही नियंत्रण नाही, पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेलाही याबाबत काहीच माहिती नाही. समान पाणीपुरवठा योजना राबविताना असे बेकायदा नळजोड उघडकीस येतील का? आणि आले तर असे बेकायदा नळजोड काढणार का? याबाबत या योजनेत काहीच स्पष्ट करण्यात आलेले नाही. या योजनेचे काम सुरू असताना बेकायदा नळजोड दिसले तरी असे जोड काढण्याबाबत काहीच सूचना नसल्याचे तसेच योजनेचे काम झाल्यानंतरही बेकायदा नळजोड दिले जाणार नाहीत, याबाबतही ठोस सांगता येत नसल्याने या योजनेत बेकायदा नळजोडच मोठा अडथळा ठरणार आहेत.
या योजनेत नव्य वाहिन्या टाकण्यात येणार असल्या तरी दोन हजार किलोमीटर लांबीच्या जुन्या आणि जीर्ण जलवाहिन्या कायम ठेवण्यात येणार असल्याने यातून होणाऱ्या गळतीचे काय, ती कशी थांबणार, याबाबत कोणत्या उपाययोजना होणार, याबाबतही प्रशासनाकडून काहीच स्पष्ट करण्यात आलेले नाही.
– निखिल शिंदे, अध्यक्ष
नमस्कार प्रतिष्ठान
समान पाणीपुरवठा योजनेत 24 तास पाणीपुरवठा होईल, असे म्हटले आहे; परंतु हे शक्य वाटत नाही. समान पाणीपुरवठा झाला तरी पुष्कळ आहे. समान पाणीपुरवठा ही योजना नावालाच राहण्याची अधिक शक्यता आहे.
– तानाजी गंभीरे,
सामाजिक कार्यकर्ता