करोना काळातील भूमिकेवरही टीका
पुणे – कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान काही गडबड केली असती, तर त्यांना “जशास तसे’ उत्तर दिले असते, अशी प्रतिक्रिया भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
संसदेत महाराष्ट्राबद्दल करोनाविषयी केलेल्या विधानाच्या विरोधात कॉंग्रेसने बापट यांच्या निवासस्थानाबाहेर शुक्रवारी आंदोलन केले. यानंतर बापट यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली.
“भाजप कोणत्याही राजकीय पक्षाला आंदोलन करण्याला विरोध करत नाही. म्हणून माझ्या घरासमोर आंदोलन होणार म्हटल्यावर चारशे-पाचशे कार्यकर्ते जमा झाले होते. परंतु त्यांना मुद्दाम येथे बोलावले नाही, नाहीतर आंदोलकांचे महत्त्व वाढले असते. कॉंग्रेसच्या आंदोलनात 22-25 देखील कार्यकर्ते नव्हते,’ असे बापट म्हणाले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी अजिबात कोणाची माफी मागणार नाहीत.
मोदींनी मुंबईचे जे उदाहरण दिले ते खरे आहे. ज्या पद्धतीने मुंबईला रेल्वे स्टेशनवर कामगार बोलावले, त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण केले, गर्दी केली, सरकारी नियम तोडले त्या सगळ्या कामगारांची काळजी केंद्र सरकारने आधीच घेतली होती. त्यामुळे मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच नाही. उलट करोना काळात सरकारला सहकार्य न केल्याबद्दल कॉंग्रेसने देशाची माफी मागितली पाहिजे,’ असे बापट म्हणाले.