– मयूर भुजबळ
तळेगाव ढमढेरे – वेळ नदीपात्रात थेट मिसळणारे मैलामिश्रित पाणी, घनकचरा सांडपाणी, जलपर्णीमुळे प्रदूषित झाली आहे. वेळ नदीत मैला जात आहे. औद्योगिकीकरणामुळे ही नदी प्रदूषित झाली आहे. त्यात जलपर्णीची मगरमिठी सुटता सुटेना, अशी विदारक स्थिती निर्माण झाली आहे. यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहेत.
वेळ नदीत दूषित पाणी जात असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे.
संपूर्ण गावाचा विचार केला तर नदीच्या पात्राकडे लक्ष टाकल्यास विदारक चित्र समोर दिसत आहे. जलपर्णी आणि तत्सम वनस्पतींनी व्यापलेले पात्र, नदीकाठावर उभे राहिल्यास अनुभवावयास येणारी दुर्गंधी आणि वाहणारे काळे पाणी वेळ नदीचे हे विदारक रूप सध्याचे वास्तव दर्शवित आहे.
तळेगाव ढमढेरेची वेळ नदी पाणी नव्हे, तर विष वाहून नेत आहे. नदीत मिसळणाऱ्या विषयुक्त पाण्यामुळे नदी मधील जलचर प्राण्यांच्या अस्तित्वापुढे धोका निर्माण झाला आहे. वेळ नदीचे पात्र जलपर्णीच्या मगरमिठीत अडकलेले दृश्य दिसत आहे. वास्तविक नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी स्वयंशिस्तीची गरज आहे. तसेच लोकसहभागाची गरज आहे. यात प्रशासनाने ठोस भूमिका घेत व्यापक उपाययोजना राबविण्याची गरज आहे.
मात्र, स्थानिक प्रशासन आणि राजकीय इच्छाशक्ती दिसत नाही. सांडपाणी व कचऱ्याची प्रक्रिया होणे आवश्यक आहे. प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर कडक कायदेशीर कारवाईची मागणी होत आहे. नदी बचाव मोहीम हाती घेऊन नदी स्वच्छतेसाठी लोकसहभाग वाढवणे गरजेचे बनले आहे. अन्यथा विष वाहून नेणारी तळेगावची वेळ नदी जटिल होणार आहे, असे चित्र सध्याचे आहे.
मरणासन्न नदीपात्र बकाल
वेळ नदी सध्या अतिशय मरणासन्न अवस्थेत आहे, अशा नदीत पाणी नव्हे, तर विष वाहून नेत आहेत. विषयुक्त नद्यांनी आरोग्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे, असे स्थानिक ग्रामस्थ यांना वाटत आहे. नागरिकांमधील आणि स्थानिक प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे नदी प्रदूषण अधिक गतीने होत आहे. नदीमध्ये थेट टाकण्यात येणारा कचरा आणि थेट सोडण्यात येणारे सांडपाणी, मैलामिश्रित पाण्यामुळे पात्राची अवस्था बकाल झाली आहे, तरीही प्रशासकीय पदाधिकाऱ्यांनी दखल घेऊन वेळ नदीची स्वच्छता करावी.