बारामती/ जळोची – गार्डनमध्ये मुले-मुली बसलेले असतात. याठिकाणी एखादा कोणी वेडा वाकडा वागला तर टुकार पोरांची गय करणार नाही. बारामतीतील कायदा व सुव्यवस्थेला ठेच लावणारा मग तो कोणीही असो, त्यामुळे प्रत्येक आई बापाने आपल्या मुलाला समजावून सांगावे, असा सज्जड दमच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामतीकरांना दिला आहे.
पवार हे शनिवारी (दि. 18) बारामती दौऱ्यावर आले असता आप्पासाहेब पवार उद्योग भवनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बारामती सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन रणजित पवार यांनी प्रास्तविक केले. यावेळी उपाध्यक्ष मनोज पोतेकर,बारामती बॅंकेचे चेअरमन सचिन सातव, अविनाश लगड, रोहिदास हिरवे, पौर्णिमा तावरे, पुरुषोत्तम जगताप, संग्राम सोरटे, जय पाटील, संभाजी होळकर उपस्थित होते.
पवार म्हणाले की, फॅमिली आणि मुलींना टवाळ पोरांनी कुणाला काय केलं तर ते कुणाचेही पोरगं असेल तर मी सोडणार नाही. बारामती सगळ्यांना सुरक्षित वाटले पाहिजे. आजचा वेळ मी कुटुंबासाठी दिला आहे. आज माझ्या आईचा वाढदिवस आहे. माझा भाऊ 60 व्या वर्षांत पदार्पण करतो आहे. त्याचे केस पांढरे आणि माझे केस काळे आहेत. हा रंगाचा परिणाम आहे, अशी मिश्किल टिप्पणी करताना उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडाले.
पवार म्हणाले की, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून रेल्वेच्या बारामती शहरातील सेवा रस्त्यासाठी आवश्यक जागेचा विषय मार्गी लागला आहे. तेथील रेल्वेच्या जागेसाठी पूर्वी 6 टक्के रकमेची मागणी केली होती. ती दीड टक्यावर आली आहे. त्यामुळे आता पंचायत समितीपर्यंत रखडलेल्या सेवा रस्त्याचे काम लवकरच सुरु होईल. तीन हत्ती चौकात उंचवटा करण्याशिवाय पर्याय नव्हता.
पूर्वी नीरा डावा कालव्याचे पाणी 450 क्युसेकने जात असे. आता उंचवट्यामुळे 1000 ते 1100 क्युसेक पाणी वाहणार आहे. ते काम पूर्ण झाल्यावर जाणवेल. विकासकामे करताना सहनशीलता आवश्यक आहे. नवीन कल्पना सुचल्यास जरुर सांगा, त्यावर चर्चा करा. बारामतीत “बेस्ट’ करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
कर्ज फेडा अन् जप्ती टाळा
पवार म्हणाले की, आता फक्त शेती करून चालणार नाही. शेतीसोबत कोणतातरी व्यवसाय करावा लागेल. फक्त घेतलेले कर्ज फेडा. जप्तीची कारवाई होऊ देऊ नका. यंदाच्या बजेटमध्ये आम्ही बारामतीसाठी निधी आणला आहे. रस्ते चांगले झाले म्हणून गाड्या हळू चालवा. नागरिकांनी जास्तीत जास्त झाडे लावण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.