राजगुरूनगर – मागील चार दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पाऊस पडला तर काही ठिकाणी गाराही पडल्याने अनेक ठिकाणी गहू, हरभरा, मका, द्राक्ष यांचे नुकसान झाल्याने हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसामुळे जातो का काय अशी स्थिती शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात बुधवार (दि. 15), गुरुवार (दि. 16), शुक्रवार (दि. 17) तसेच शनिवारी (दि. 18) विविध भागांत कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेला गहू, हरभरा, कांदा पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. तर शनिवारी जेजुरी (ता. पुरंदर) परिसरात विजांसह गारांचा पाऊस झाल्याने त्याचा अंजीर, सीताफळ बागांना सर्वाधिक फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
तर गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने या वातावरणाची बळीराजाने धास्ती घेतली आहे. जिल्ह्यात अनेक भागात गहू सोंगणीला आलेला असताना हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतलेला आहे. तर उन्हाळ कांद्याची काढणी सुरू झाली असून या पावसाचा या कांद्यालाही मोठा फटका बसलेला आहे. गहू, हरभरा, मका, हे सोंगणीला आलेले पीक पावसात भिजल्याने खूप मोठे नुकसान झाल्याचे बळीराजाचे म्हणणे आहे.
बळीराजा घायकुतीला
अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत सलग चार दिवस विजांचा कडकडाट अन् ढगांच्या गडगडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. चारही दिवस ढगाळ वातावरण कायम होते. द्राक्षांबरोबरच कांदा, गहू, हरभरा, आंबा आणि भाजीपाल्याचेही या पावसाने नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाच्या आपत्तीने आधीच घायकुतीला आलेल्या शेतकरी या नव्या आपत्तीने पुरता खचला आहे. त्याच्या हातातोंडाशी आलेला घास डोळ्यांदेखत हिरावला जात आहे.