रांजणगाव गणपती -अवकाळी पावसाने झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. मात्र, पिकांना रोगराईने ग्रासल्यामुळे व बाजारभाव कोसळल्यामुळे शेतकरी पुन्हा अर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे सोसायट्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
कांदा व ऊस पिकाबरोबरच शेतकरी टोमॅंटो, गाजर, काकडी, कोथिंबीर, मेथी, शापू, कांदा, प्लॉवर, कोबी, दोडका, कारले, गवार, वाल आदी पिकांना पसंती देऊ लागला आहे. मात्र, अनेक दिवसांपासून गवार पीक वगळता सर्वच पिकांचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचे अर्थकारण बिघडले आहे.
रोगराईमुळे व बाजारभाव ढासळल्यामुळे आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षभराचे अर्थिक नियोजन कोलमडले आहे. दोन वर्षे करोनातून कसे तरी सावरुन आर्थिक घडी सुरळीत करीत असतानाच मागील वर्षी आँक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने पुन्हा होत्याचे नव्हते केले होते.
त्यातून ही सावरण्यासाठी शेतकरी धडपडत असताना बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफी द्यावी, अशी मागणी वाघाळे गावचे माजी सरपंच जयराम कारकुड यांनी केली आहे. दरम्यान, वाघाळे येथील प्रगतशील शेतकरी विजय दादाभाऊ थोरात यांनी टोमॅटोची लागवड केली आहे.
या लागवडीसाठी त्यांना रोपे, मजुरी, मल्चिंग पेपर, औषधे व खतांसाठी एक लाख रुपये खर्च आला. मात्र, टोमॅटोच्या पहिल्या तोड्याच्या आधीच टोमॅटोवर टुटा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फळे खराब झाली आहेत. त्यामुळे थोरात यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे शासनाने पिकांना पीक विमा संरक्षण उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी विजय थोरात यांनी केली आहे.