पुणे – औद्योगिक कंपन्या व व्यापारी यांना त्रास देणाऱ्या बेकायदेशीर संघटनांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिला आहे. औद्योगिक कंपन्या, व्यापारी, आयटी कंपन्याने अनधिकृत माथाडी किंवा माथाडीचे नावाखाली त्रास देणाऱ्यांची तक्रार न घाबरता करावी, असे आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आले.
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे अध्यक्षेतेखाली पुणे आयुक्तालय हददीतील औद्योगिक कंपन्या, आयटी कंपन्या, व्यावसायिक व्यापारी संघटना, चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज, ऍग्रिकल्चर यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. गुन्हेगारी टोळ्यांमार्फत व्यापारी, उजोजक यांच्याकडून खंडणीची वसुली, माथाडी कामगार म्हणून गुंडगिरी, नोकरदार महिलांचे सुरक्षेबाबत विशाखा कमिटी, वाहतूक समस्या व इतर शासकीय खात्यांबाबत तक्रारी या विषयावर बैठकीत चर्चा झाली. औद्योगिक कंपन्या, आयटी कंपन्या, व्यावसायिक व्यापारी संघटना, चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज, ऍग्रिकल्चर यांचे सुमारे 100 ते 120 प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीस पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, उपायुक्त (विशेष शाखा) आर. राजा, उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, उपायुक्त (वाहतूक) विजय मगर, सुहेल शर्मा, स्मार्तना पाटील, विक्रांत देशमुख, शशिकांत बोराटे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र साळुंके, पोलीस निरीक्षक (खंडणी विरोधी पथक) प्रताप मानकर, अजय वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते.
उद्योजक, व्यावसायिक म्हणतात…
“शहरात गुन्हेगारी टोळ्यांमार्फत खंडणी वसुली, माथाडी कामगारांकडून पैशांची मागणी, दादागिरी तसेच वर्गणीच्या नावावर खंडणी मागितली जाते, असे निदर्शणास आणून दिले. तसेच माथाडी कामगारांचे मजुरी दर ठरवून ते प्रदर्शित करावेत. वाहतूक समस्येबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात,’ आदी प्रमुख मागण्या उद्योजकांनी मांडल्या.
पोलीस आयुक्त म्हणाले…
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सर्वांनी केलेल्या सूचना लक्षात घेत संबंधित पोलीस उपायुक्त परिमंडळ, पोलीस स्टेशनला कळवून ठोस कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. उद्योजकांनी न घाबरता आपल्या तक्रारी द्याव्यात. वाहतूक समस्यांबाबत कंपन्यांशी संपर्क साधून ट्राफिक वार्डनची संख्या वाढविण्याबाबत उपायुक्त (वाहतूक) मगर यांना निर्देश दिले.