शिरूर – कवठे येमाई (ता.शिरुर) येथील इनाम वस्ती नजीक असणाऱ्या खार ओढ्यात पाय घसरून पाण्यात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह दोन दिवसांनी मंगळवार (दि. २६) रोजी सापडला आहे.
कवठे येमाई येथील इनाम वस्ती परिसरातील खार ओढ्यात पाय घसरून राजेंद्र विक्रम कोळी (वय २५, रा. मालखेडा, ता मुक्ताईनगर जि. जळगाव) हा तरुण बुडाल्याची घटना घडली होती.
रविवार (दि. २४) रोजी ग्रामस्थ, स्थानिक प्रशासन, महसूल विभाग, पोलीस प्रशासन व पुणे प्राधिकराणाच्या अग्निशामक विभागाच्या बचाव पथकाने दिवसभर अथक प्रयत्न करून देखील तो मिळून आला नव्हता.
सोमवारी पाण्याची पातळी जास्त असल्याने मदत कार्यात अडचणी आल्या. मात्र, मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास पोलीस पाटील गणेश पवार हे घटनास्थळी पाहणी करिता गेले असता पाण्याची पातळी खाली गेली असल्याने त्यांना या तरुणाचा मृतदेह एका दगडाला अडकलेला आढळून आला.
त्यांनी याबाबतची खबर टाकळी पोलीस स्टेशनला दिली असता घटनास्थळी पोलीस दाखल होऊन त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी मृतदेह शिरूर ग्रामीण उपरुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.
या मदतकार्यात निवासी गायब तहसीलदार स्नेहा गिरी गोसावी, मंडलाधिकारी माधुरी बागले, तलाठी ललिता वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले, पोलीस नाईक उमेश भगत विष्णू दहिफळे, दीपक पवार, पोलीस पाटील गणेश पवार,
तसेच माजी पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, उपसरपंच उत्तम जाधव, सामाजिक कार्यकर्ते किसन हिलाळ, पांडुरंग भोर, अविनाश पोकळे, बाबाजी वागदरे, बाबू खाडे यांनी विशेष मेहनत घेतली.