पाबळ – शिरूर तालुक्यातील बहुचर्चित पाबळ येथील ग्रामीण रुग्णालयात येत्या (दि.8) रोजी तूर्त बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहे. याबाबत पत्र वैद्यकीय अधीक्षक वृषाली राऊत यांनी दिल्यानंतर बाजीराव मस्तानी सांस्कृतिक प्रतिष्ठानने ठिय्या आंदोलन तूर्त मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर नऊ तारखेला पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करण्यात येणार आहे.
यावेळी बाजीराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय डहाळे, सचिव मारुती शेळके, सहसचिव चंद्रशेखर वारघडे, खजिनदार दौलत गायकवाड, सदस्य प्रशांत मेड, युवराज गावडे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे बिर्गीकर, संजय जाधव, श्रीराम जाधव, माजी सैनिक सुनील चौधरी, कुमार चौधरी, स्थानिक नागरिक, आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
आंबेगाव- शिरूर मतदारसंघातील पाबळ येथे 15 कोटी खर्च करून उभारण्यात आलेल्या अद्ययावत ग्रामीण रुग्णालयाची इमारत गेली चार वर्षे धूळखात पडली आहे. ते सुरू होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर पाबळ येथील श्रीमंत बाजीराव सांस्कृतिक प्रतिष्ठानने आक्रमक भूमिका घेत (दि.28) रोजी प्राथमिक स्वरूपात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते.
यावेळी आरोग्य अधीक्षक वृषाली राऊत यांनी आंदोलक व पत्रकारांची बैठक घेऊन आठ दिवसांत बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हा शल्य चिकित्सक नागनाथ एम पल्ले यांचे माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्रकारांनी त्यांनी समोर येऊन लेखी आश्वासन द्यावे, असा आग्रह धरला. त्यानंतर जिल्हा चिकित्सक यांच्याशी भ्रमणध्वणीवर संपर्क करण्यात आल्यावर राऊत यांनी लेखी पत्र दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
श्रेयासाठी कायपण
रुग्णालयात सुरूवातीला काम अपूर्ण असल्याचे कारण पुढे केले जात असल्याबाबत उलटसुलट माहिती देऊन श्रेय घेण्यासाठीची बाब यावेळी उघड झाली. याबाबत येत्या दोन महिन्यांत सुसज्ज रुग्णालय सुरु होईल, अशी ग्वाही राऊत यांनी दिल्याने श्रेयासाठी “कायपण’चा पुन्हा एकदा प्रत्यय आल्याची चर्चा होती.
प्रश्न तूर्त मार्गी
पाबळ रुग्णालयाची उभारणी पूर्ण झाल्यापासून दैनिक प्रभात व डिजिटल प्रभातच्या माध्यमातून यावर अनेकवेळा प्रकाशझोत टाकण्यात आला होता. यावेळीही पत्रकारांनी आग्रह धरून ही बाब नेटाने चालवल्याने प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा प्रश्न तूर्त मार्गी लागल्याची चिन्हे दिसत आहे.