भारत आणि इजिप्तदरम्यान संबंधासाठी 2023 हे वर्ष खूप आश्वासक आहे. इजिप्त सध्या आर्थिक संकटातून जात आहे. संकटावर मात करण्यासाठी त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. सामरिक दृष्टिकोनातूनही भारत इजिप्तचे महत्त्व जाणून आहे. भारताने इजिप्तच्या अध्यक्षांना प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावणे आणि भारत-इजिप्त सामंजस्य कराराने पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या आहेत.
भारत आणि इजिप्तमधील संबंध नेहमीच सौहार्दपूर्ण राहिले आहेत. करोना संकटाच्या काळात भारताला वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या काही देशांपैकी इजिप्त एक आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केवळ तीनच दिवसांनी, दोन्ही देशांनी औपचारिक संबंध प्रस्थापित केले. आता हा प्रवास 2023 पर्यंत पोहोचला आहे. भारत आणि इजिप्त यांच्या राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. एवढेच नाही तर इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी हे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते.
भारत-इजिप्त संबंधांमधील हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. दोन्ही देश सुरक्षा संबंध वाढवत असताना ही भेट महत्त्वपूर्ण ठरत आहे. गेल्या काही वर्षांचा विचार केल्यास भारत आणि इजिप्तमधील व्यापारी संबंध दृढ झाले आहेत. सध्या इजिप्तची आर्थिक स्थिती बिकट आहे. या संकटाच्या काळात भारत इजिप्तसोबत मित्रत्वाची भूमिका बजावत आहे. इजिप्त हा मुस्लीम देश आहे; पण तो नेहमीच पाकिस्तानच्या धोरणांना आणि दहशतवादाला विरोध करत आला आहे. कदाचित त्यामुळेच भारत आणि इजिप्तमधील संबंध दृढ झाले आहेत. इजिप्तमध्ये भारत एक गुंतवणूकदार म्हणून उदयास आला.
इजिप्त हा पारंपरिकपणे भारताचा सर्वात महत्त्वाचा आफ्रिकी व्यापारी भागीदार आहे. मार्च 1978 पासून, दोन्ही देश “मोस्ट फेव्हर्ड नेशन’ कलमावर आधारित द्विपक्षीय व्यापार कराराने बांधील आहेत. अलीकडच्या वर्षांत भारत आणि इजिप्तमधील व्यापारी संबंधही लक्षणीय वाढले आहेत. सध्याच्या भारतीय गुंतवणुकीसह 3.15 अब्ज डॉलर गुंतवून भारत इजिप्तमधील सर्वात मोठा गुंतवणूकदार ठरला आहे.
सुरक्षा, नवीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, आयटी, फार्मास्युटिकल्स, कृषी, उच्च शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान यासारख्या अनेक क्षेत्रात भारत आणि इजिप्तमधील भागीदारी मजबूत होत आहे. काही काळापासून दोन्ही देश संरक्षण आणि कृषी क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर विशेष भर देत आहेत. भारत आणि इजिप्तचे संबंध सखोल असले तरी सध्या पाकिस्तानप्रमाणेच या मुस्लीम देशाची आर्थिक स्थिती बिकट आहे. इजिप्तमधील चलनवाढीचा दरही पाकिस्तानच्या जवळपास समान आहे. पाकिस्तानमध्ये महागाई 24.5 टक्क्यांवर पोहोचली आहे, तर इजिप्तमध्येही 24 टक्क्यांच्या महागाईमुळे जनता त्रस्त आहे. नव्या युगात भारत इजिप्तसाठी संजीवनी ठरू शकतो आणि दोन्ही देश संबंधांची नवी उंची गाठू शकतात.
इजिप्तने भारताकडून तेजस हलकी लढाऊ विमाने, रडार, लष्करी हेलिकॉप्टर आणि लष्करी उपकरणे खरेदी करण्यात उत्सुकता दर्शविली आहे. कारण दोन्ही बाजूंनी संरक्षण क्षेत्रात सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्यातील शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेदरम्यान इजिप्तच्या बाजूने भारतीय लष्करी साहित्य स्वीकारण्याची उत्सुकता व्यक्त करण्यात आली. तेजसच्या खरेदीबाबत इजिप्तने भारतासोबत आधीच प्राथमिक चर्चा केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इजिप्त भारताकडून आकाश क्षेपणास्त्र आणि स्मार्ट अँटी-एअरफिल्ड सिस्टम खरेदी करण्याचा विचार करत आहे.
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, मलेशिया, अर्जेंटिना आणि फिलीपिन्स या देशांनीही भारताच्या तेजस विमानात स्वारस्य दाखविले आहे. त्यांच्या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि सिसी यांनी भारत-इजिप्त द्विपक्षीय सहकार्य धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर वाढविण्याचा निर्णय घेतला. दोन्ही बाजूंनी प्रशिक्षण, सराव, औद्योगिक भागीदारी व्यासपीठ आणि उपकरण या क्षेत्रात संरक्षण सहकार्य वाढविण्याचा संकल्प केला आहे. त्याचवेळी, गेल्या काही वर्षांत दोन्ही बाजूंमधील एकूणच संरक्षण संबंध दृढ झाले आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये, भारतीय हवाई दलाने तीन एसयू-30 एमकेआय जेट आणि दोन सी-17 वाहतूक विमानांसह इजिप्तमध्ये महिनाभर चाललेल्या व्यूहात्मक कार्यक्रमात भाग घेतला होता. सप्टेंबरमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आफ्रिकन देशाचा तीन दिवसांचा दौरा केला होता. इजिप्त हा अरब जगतातील तसेच आफ्रिका या दोन्ही देशांच्या राजकारणातील प्रमुख घटक आहे.
आफ्रिका आणि युरोपमधील बाजारपेठांचे प्रमुख प्रवेशद्वार म्हणूनही याकडे पाहिले जाते. भारत आणि इजिप्तमधील व्यापारी सहकार्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भारताला चांगल्या मित्राची गरज असताना आर्थिक संकटाशी झुंजणाऱ्या इजिप्तचा हात भारताने धरला. राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांच्या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये अनेक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष अल सिसी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. सीसी यांनी मोदी यांना इजिप्तला भेट देण्याचे निमंत्रण दिले आहे. भारत आणि इजिप्तमध्ये सायबर सुरक्षा, संस्कृती, माहिती आणि तंत्रज्ञान, युवा घडामोडी आणि प्रसारण या क्षेत्रात करार झाले आहेत.
मोदी म्हणाले, की भारत आणि इजिप्त या दोन्ही संस्कृती जुन्या आहेत. दोघांचा व्यापार विषयक इतिहास चांगला आहे. गेल्या काही वर्षांत आमचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ झाले आहेत. या वर्षी आम्ही इजिप्तला जी-20 बैठकीत विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे. आमच्याकडे संयुक्त लष्करी सराव आणि क्षमता निर्माण करण्याबाबत करार आहेत. याशिवाय आम्ही सायबर स्पेसच्या सुरक्षेसाठी, कट्टरतावाद आणि इतर बाबींमध्ये सहकार्य करू. कोविड आणि युक्रेनच्या संकटादरम्यान विस्कळीत झालेली पुरवठा साखळी सुधारण्याचा निर्णयही आम्ही घेतला आहे.
भारत आणि इजिप्त या दोन्ही देशांचे लक्ष पर्यटनावर आहे. याशिवाय सीमेपलीकडून होणारा दहशतवाद रोखण्यासाठी दोन्ही देशांनी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय दोन्ही देशांदरम्यान 12 अब्ज द्विपक्षीय व्यापाराचा करारही करण्यात आला आहे. अब्देल फताह अल-सिसी म्हणाले, की आम्ही ग्रीन हायड्रोजन, अक्षय ऊर्जा क्षेत्रात काम करण्यासाठी चर्चा केली. याशिवाय दोन्ही देशांमधील वाहतूक आणि पर्यटनाबाबत सविस्तर चर्चा झाली. आम्ही गुंतवणूक आणि व्यापार वाढविण्याच्या मार्गांवरही चर्चा केली. याशिवाय आम्ही दोघेही दहशतवादाविरोधातील मोहिमेत एकत्र काम करू. दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध प्रस्थापित होऊन 75 वर्षे पूर्ण झाली आहेत; परंतु भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांना प्रमुख पाहुणे बनवण्याची ही पहिलीच वेळ आहे. सीसीच्या कार्यालयाच्या प्रवक्त्याने भारताच्या निमंत्रणाचे वर्णन दोन्ही देशांमधील उत्कृष्ट संबंधांचा आणि इजिप्शियन लोक आणि नेतृत्वाबद्दल भारताच्या कौतुकाचा पुरावा म्हणून केला.
दोन्ही देशांमधील संबंधांना “स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा देण्यात आला. धोरणात्मक भागीदारीअंतर्गत दोन्ही देश राजकीय, सुरक्षा, आर्थिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात अधिक सहकार्य करतील, असे ट्वीट मोदी यांनी केले आहे. यासोबतच उभय देशांच्या संरक्षण उद्योगांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याचा आणि दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी माहिती आणि गुप्तचरांची देवाणघेवाण वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आला. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इजिप्तचे दुसरे राष्ट्राध्यक्ष गमाल अब्देल नासेर यांनी तत्कालीन युगोस्लाव्हियन राष्ट्राध्यक्ष जोसिप ब्रोझ टिटो यांच्यासमवेत अलिप्त राष्ट्र चळवळीचा पाया घातला, तेव्हापासून आजपर्यंत दोन्ही देशांमधील संबंध स्थिर आणि मैत्रीपूर्ण आहेत. इजिप्तच्या राजकारणात प्रदीर्घ उलथापालथ होऊनही दोन्ही देशांमधील संबंध स्थिर राहिले. दोन्ही देशांचे नेते एकमेकांच्या देशांना अधिकृत भेटी देत आहेत आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भेटीही घेत आहेत.
इजिप्त हा अरब देश आहे आणि त्याच्याशी संबंध अधिक दृढ करणे हा अरब देशांशी भागीदारी वाढविण्याच्या भारत सरकारच्या धोरणाचा एक भाग आहे. इजिप्त हे “मवाळ इस्लाम’चे प्रतिनिधित्व करते आणि सीसी यांना आमंत्रित करून, मोदी यांना भारतामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संदेश द्यायचा आहे, की त्यांचे सरकार मुस्लीमविरोधी नाही. जून 2022 मध्ये, भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे उद्भवलेल्या वादावर इजिप्तच्या बाजूने कोणतीही अधिकृत टिप्पणी करण्यात आली नव्हती.
इजिप्त हा इस्लामिक देशांची संघटना असलेल्या “ओआयसी’चाही सदस्य आहे आणि “ओआयसी’मध्ये पाकिस्तानच्या प्रभावाचा मुकाबला करण्यासाठी इजिप्तला उभे करण्याच्या उद्देशाने भारताचे हे पाऊल असल्याचे मानले जाते. पाकिस्तान निर्माण झाल्यापासून त्याचे भारताशी चांगले संबंध राहिलेले नाहीत. तो नेहमीच दहशतवादाला खतपाणी घालत आला आहे आणि त्याच्या कार्यशैलीवरून तो दहशतवादाला गांभीर्याने घेतो असे कधीच वाटत नाही. भारत आणि इजिप्तने दहशतवादाबाबत कठोर भूमिका घेतली आणि दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध “झिरो टॉलरन्स’चे धोरण स्वीकारले. त्यामुळे पाकिस्तानला मिरच्या झोंबणे स्वाभाविक आहे.
– आरिफ शेख