सविंदणे-शिरुर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला स्वकीयांनीच बेजार केले आहे. शहरप्रमुख म्हणून शहरात युवकांना संघटित करीत चांगले काम करणारे युवक सुनील जाधव यांना अवघ्या सात महिन्यांत शहरप्रमुख पदावरून हटवले आहे. त्यांना पदावरुन हटवल्याच्या निर्णयाने शहरातील युवक व सच्चे शिवसैनिक नाराज झाले आहे.
गटबाजीचा शाप लागलेल्या शिरूर शहर व तालुका शिवसेनेच्या ठाकरे गटात पदांच्या नवनियुक्त्यांवरून पुन्हा गोंधळ सुरू झाला आहे. सातच महिन्यांपूर्वी शहर प्रमुखपदी विराजमान झालेले जाधव यांना तडकाफडकी बदलून त्यांच्या जागी संजय देशमुख या पूर्वीच्याच शहर प्रमुखाची नियुक्ती केली आहे. शिवसैनिक, पदाधिकारी, जाधव समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जाधव यांच्या नियुक्तीचा फेरविचार न झाल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा इशाराही दिला आहे.
युवासेनेचे शहर पदाधिकारी असलेले जाधव यांची 10 ऑगस्ट 2022 रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख म्हणून नियुक्ती झाली. पूर्वमुखी हनुमान गणेश मंडळाचे अध्यक्ष व श्रीराम सेनेचे शहर प्रमुख असलेल्या जाधव यांच्यामागे तरुण कार्यकर्त्यांची फौज आहे. प्रभावी आंदोलनातून त्यांनी शहर आणि तालुक्याचे लक्ष वेधून घेतले होते.
जाधव यांची कारकिर्द ऐन बहरताना त्यांच्या पदावर गंडांतर आले आहे. संघटनात्मक बांधणीत कमी पडल्याचे कारण त्यासाठी लावले जात असल्याचे समजते. देशमुख हे सध्या जिल्हा संघटकपदावर कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी शहर प्रमुखपद तब्बल 14 वर्ष भूषविले होते. या वेगवान घडामोडीचे तीव्र पडसाद शिवसैनिकांमध्ये उमटले आहेत. या निर्णयाचा फेरविचार न झाल्यास सामूहिक राजीनाम्याचा इशाराही त्यांनी दिला.
तालुका प्रमुख गणेश जामदार, उप तालुकाप्रमुख अनिल पवार, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ, युवा नेते अविनाश घोगरे, संतोष काळे, स्वप्निल रेड्डी यांच्यासह शिवसैनिकांनी या परिस्थितीला शिरूर तालुकाप्रमुख पोपट शेलार हेच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
पक्षांतर्गत संवाद साधून मार्ग काढू : शेलार
तालुकाप्रमुख पोपट शेलार म्हणाले की, मी पक्षाचा निष्ठावान सैनिक असून, पक्षादेशाप्रमाणे काम करतो. पक्षनिर्णय शिरसावंद्य मानून काम करताना सर्वांची मोट बांधून यापुढेही काम करण्याचा प्रयत्न करू. पक्षांतर्गत बाब असल्याने आम्ही आमच्या पातळीवर परस्पर संवाद साधून मार्ग काढू. या विषयावर मी अधिक प्रतिक्रिया देऊ शकत नाही.
मी स्वतःहून पद मागायला गेलो नव्हतो- जाधव
सुनील जाधव म्हणाले की, मी कधीही पक्षाकडे स्वतःहून पद मागायला गेलो नव्हतो. परंतू, पक्षाने माझे काम, तरूणांचे संघटन, सामाजिक उपक्रम बघूनच मला शहर प्रमुखपद दिले होते. पण, काही स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या डोळ्यात माझे काम सलत होते. कारण त्यांना हे काहीच करता येत नव्हते. त्यांनीच माझ्याविरोधात षडयंत्र रचून बदनामी केली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पद काल होते, आज गेले. पण शिवसैनिक म्हणून पक्षाशी एकनिष्ठ राहूनच काम करण्याचा आणि नावाला पदे मिरविणारांना उघडे पाडण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पक्षाने जी जबाबदारी सोपविली, ती इमानेइतबारे पार पाडताना, या अडचणीच्या काळात पक्षसंघटन मजबूत करणार असल्याचे यांनी सांगितले.
– संजय देशमुख, शहर प्रमुख, शिरूर.