अकलूज -अकलूज शहर तसेच शहरातुन वेळापूर, इंदापूर, टेंभुर्णी, माळशिरसकडे जाणाऱ्या रस्त्यांची धूळधाण झाली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम प्रशासनाचे चांगलेच दुर्लक्ष झाले आहे. परिणामी नागरिकांना या रस्त्यांवरुन यातनामय प्रवास करावा लागत आहे. तसेच नागरिकांना विविध आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे नागरिकांमदून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अकलूज शहर तसेच परिसरातील रस्ते पावसामुळे खराब झालेले आहेत. जागोजागी खड्डे पडून रस्त्यावरील धुळीमुळे अकलूजकरांसह परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे श्वसनाचे आजार होण्याची शक्यता तज्ज्ञ डॉक्टरांकडून व्यक्त होत आहे. या धुळीचा फटका कर्मवीर चौक ते कॉलेज रोड बायपास, कॉलेज रोड ते प्रतापसिंह चौक तसेच माळशिरस रोडवरील जयसिंह चौक सदुभाऊ चौक ते जुने बसस्थानक परिसरात बसत आहे.
अकलूज हे मेडिकल हब म्हणून ओळखले जाते. दररोज हजारो रुग्ण अकलूज येथील विविध रुग्णालयांत उपचारासाठी येत असतात. या धुळीमुळे आणखीनच त्यांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसून येत आहे. या मार्गावर काही रुग्णालयेही आहेत त्यांना सुद्धा याचा त्रास होत आहे. सायंकाळच्या वेळी या मार्गावरून जाताना अक्षरशः धुक्याप्रमाणे येणारा जाणाऱ्या वाहनामुळे धुळीचे लोट निर्माण होऊन वाहनधारकांना याचा त्रास होत आहे.
सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. तुकाराम मुंढे यांच्या काळात संपूर्ण जिल्ह्यातील अतिक्रमण काढण्यात आले होते. मात्र आता पाहिले तर विशेषतः अकलूजमध्ये सर्वच जागी अतिक्रमण दिसून येत आहे. याकडे नगरपरिषद व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या अतिक्रमणामुळे जुने बसस्थानक, गांधी चौक, सदुभाऊ चौक आदी ठिकाणी वारंवार वाहतूक ठप्प होत आहे.
कर्मवीर चौक ते कॉलेज रोड बायपास रस्त्यावरुन ये- जा करताना खड्ड्यातून मार्ग काढावा लागत आहे. सध्या ऊस गाळप हंगाम सुरू आहे. ऊस वाहतूक करणारी वाहने याच रस्त्याने जातात. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ऊस वाहतूक करणारे वाहन कधी पलटी होईल आणि त्यामुळे जीवितहानी होईल हे सांगता येणार नाही.
किती दिवस त्रास सहन करायचा?
केवळ बांधकाम खात्याच्या इच्छाशक्ती अभावी या बायपास रस्त्याचे काम ठप्प झाल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. प्रशासनाच्या या इच्छाशक्ती अभावी आणखी किती दिवस त्रास सहन करायचा? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम प्रशासन याकडे कधी लक्ष देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.