इंदापूर – तीन वर्षांपूर्वी करोना महामारीमुळे सलग 2-3 वर्षे राज्य सरकारच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला होता; मात्र आता परस्थिती सुधारली असून राज्य सरकारचे उत्पन्नही वाढले आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना वीजबिले भरण्याची सक्ती न करता संपूर्ण वीजबिल माफ करावे. त्याचप्रमाणे चालू बिलात हफ्ते पाडून द्यावेत. अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने तालुक्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे.
याविषयी सविस्तर बोलताना आमदार भरणे म्हणाले की, विरोधी बाकावर असताना भाजपवाल्यांनी वीजबिल माफीसाठी आंदोलनांची नौटंकी केली होती; मात्र हिच मंडळी आता सत्तेत आहेत; परंतु सत्तेत येताच त्यांनी शेतकरी बांधवांवर आसूड उगरायला सुरूवात केली आहे. आज मितीस तालुक्यातील गहू, ज्वारी,
मका तसेच द्राक्ष, डाळिंब, पेरू यांसारखी पिके अजूनही शिवारातच आहेत. त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसबिलांची कर्मयोगी तसेच नीरा-भीमा कारखान्याने अजून दमडीही दिली नसल्याचे शेतकरी वर्ग पुरता अडचणीत आलेला आहे. एकतर शेतमालाला योग्य बाजारभाव नाही, सोबती कधी अवकाळी सारखी अस्मानी संकटे घोंगावत आहेत.
त्याच सततच्या वाढत्या महागाईने ग्रामीण अर्थव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले असताना हे शेतकरीविरोधी सरकार वीजबिल वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास देऊन वीज कनेक्शन तोडत आहेत. वास्तविक पाहता सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे.
त्यामुळे राज्य सरकारने मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्यासाठी आम्ही उद्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या सरकारला निश्चितपणे भाग पाडणार आहे. महावितरण अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वीजबिलासाठी तगादा न लावता वीज कनेक्शन तोडण्याच्या धमक्या देऊ नयेत, अन्यथा या सरकार विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सबंध तालुकाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
-दत्तात्रय भरणे, आमदार