हिरडस मावळ – भावेखल आणि कांजळे (ता. भोर) या गावांतील ग्रामस्थांनी एकी दाखवत जे पाऊल उचलले, ते कौतुकास्पद आहे. त्यांची संकल्पना, विकासकामे मार्गी लावली जातील. फलदायी विकासकामे जनतेपर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाहीत. जनतेने ज्या विश्वासाने कौल दिला आहे त्यास तडा जाणार नाही, असे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी केले. भावेखल येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन आणि पक्ष प्रवेशाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी भावेखल आणि कांजळे गावातील ग्रामस्थांनी आमदार थोपटे यांच्या उपस्थितीत भावेखल येथील तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम कोंढाळकर, उपसरपंच मुक्ता मादगुडे, ग्रामपंचायत सदस्य आशा वाटकर, सविता वाटकर, प्रदीप गाडे, ग्रामस्थ व महिला अशा 51 जणांनी, कांजळेतील बाबूराव जाधव, बापू जाधव शामराव तांबट यांसह 40 जणांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी राजगड ज्ञानपीठाच्या मानद सचिव स्वरूपा थोपटे, गीतांजली आंबवले, बाळासाहेब थोपटे, गीतांजली शेटे, सुवर्णा मळेकर, आनंदा आंबवले, अनिल सावले, अतुल किंद्रे, रघुनाथ किरवे, सुभाष कोंढाळकर, पांडुरंग धोंडे, बाळासाहेब घोलप, विजय शिरवले, नितीन दामगुडे उपस्थित होते.
आगामी निवडणुकांत सत्तांतर?
थोपटे म्हणाले, लोकप्रतिनिधी म्हणून कामांचा पाठपुरवठा करत असतो. मात्र, आता कोणही कुठल्या पदावर नाही तरी ते नारळ फोडत सुटले आहेत, असे कोणाचेही नाव न घेता विरोधकांवर टीका केली. विरोधकांकडून आपल्या कार्यकर्त्यांना स्वाभिमानाची वागणूक मिळत नाही, त्यामुळे कार्यकर्ता पेटून उठला आहे. आगामी झेडपी, पंचायत समिती निवडणुकीत नक्की सत्तांतर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.