नारायणगाव-शिवनेरी किल्ल्यावर श्री शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात शिवभक्तांनी गर्दी केली होती. शिवप्रेमींना दर्शनासाठी न सोडल्याने छत्रपती संभाजीराजे चांगलेच संतापले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच माईक हाती घेत छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला सुनावले.
संभाजीराजे यांनी कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहूनच त्यांच्याशी संवाद साधला. दुजाभाव करू नका. आम्ही दरवर्षी येतो. पायी येत असतो. त्यामुळे शिवप्रेमींना शिवाजी महाराजांचे दर्शन घेता आलं पाहिजे. तुम्ही शिवजयंती साजरी करा. जयंती साजरी केली पाहिजे. आमची त्याला ना नाही. पण शिवनेरीवर दरवर्षी नियोजन नसते, आम्ही किती सहन करायचे? दुजाभाव करू नका. सर्वांना दर्शन घेण्याचा अधिकार आहे, असे संभाजीराजे म्हणाले.
शिवनेरीवर शिवजयंतीचा शासकीय कार्यक्रम आहे. त्यांना त्यांची भाषणे करू द्या. मी तुमच्यासोबत आहे. कार्यक्रम झाल्यावर आम्हाला आत जाऊन दर्शन घेऊ द्या. पर्सनल पास कशाला देता? हा कोणता क्रायटेरिया आहे? जिल्हाधिकाऱ्यांनी कोणता नियम लावला? दर्शनात दुजाभाव का? असा सवाल त्यांनी केला. रायगडावर नतमस्कत होण्यासाठी परवानगी दिली जाते मात्र इथे का नाही? कार्यक्रम झाल्यानंतर आम्हाला सर्वांना आत जाऊन दर्शन घेण्याची परवानगी हवीय. पुढच्या वर्षी याचे नियोजन करा, असेही छत्रपती संभाजीराजे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातात माईक घेऊन संभाजीराजे यांना कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मी तुमच्या भावनांची नोंद घेतली आहे. तुमच्या भावना ऐकल्या आहेत. हे सरकार तुमचे आहे. आपले आहे. आपण किल्ले जपण्याचे काम करू. पुढच्या वर्षीचे नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन करण्यात येईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
कुणालाही जाऊ देऊ नका
पुरातत्त्व विभागाने सांगितले महाराजांचा जन्म झाला तिथे जाता येणार नाही. तसे असेल तर मग इतर कुणालाही तिथे जाऊ देऊ नका. फक्त शिवप्रेमींनाच बंदी का? पुरातत्त्व खात्याचा हा कुठला नियम आहे? आम्हाला तुमची भाषणं ऐकायची आहेत. बाकीच्या गड किल्ल्यांची संवर्धन कसे करणार हेसुद्धा आम्हाला पाहायचे आहे. त्याचे उत्तर द्या, असे आव्हान त्यांनी दिले.