पुणे – महापालिकेकडून उरूळी देवाची आणि फुरसुंगी गावातील सुमारे 650 हेक्टरवर तीन टीपी स्कीम राबविण्यात येणार आहेत. त्यातील फुरसुंगी येथील सुमारे 238 हेक्टर जागेवरील टीपी स्कीमचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध कण्यास महापालिकेच्या मुख्यसभेत प्रशासक विक्रम कुमार यांनी मान्याता दिली आहे.
मात्र, शासनाने उरूळी देवाची आणि फुरसुंगी गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याची प्रक्रीया सुरू केली असल्याने या टीपी स्कीमचा तिढा वाढला आहे. ही गावे वगळण्यास शासनाने तत्वत: मान्यता दिल्यानंतर, महापालिकेने कचरा डेपो आणि टीपी स्कीम पालिकेच्या ताब्यात ठेवाव्यात, अशी मागणी केली होती. मात्र, शासनाने गावे वगळण्यासाठी काढलेल्या हरकती आणि सूचनांच्या आदेशात केवळ कचरा डेपोच वगळला असून टीपी स्कीम बाबत काहीच निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे, महापालिका प्रशासनही गोंधळात पडले आहे.
महापालिकेने उरूळी देवाची, फुरसंगी या नव्याने समाविष्ट गावांमधून जाणाऱ्या 110मी. व सुधारीत 65 मी. रुंदीच्या बाह्यवळण मार्गाच्या दुतर्फा टीपी स्कीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च 2019 मध्ये यासंदर्भात कार्यवाही करण्यासाठी सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे. सुमारे 650 हेक्टर क्षेत्रावर तीन टीपी स्किम (झचउ ढझ ीलहशाश) राबविण्यात येणार आहेत. दरम्यानच्या काळातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहिता तसेच करोनामुळे प्रारुप आराखडा तयार करण्यास विलंब झाला होता. हा प्रारुप आराखडा तयार झाला असून त्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. मात्र, ही दोन्हीही गावे महापालिकेतून वगळण्यात येणार असल्याने सदर आराखड्याला महत्त्व उरलेले नाही. यात प्रशासनाचा वेळच वाया गेल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
वाढीव मिळकतकराचा मुद्दा…
महापालिकेकडून वाढीव मिळकतकराची वसुली केली जात असल्याने तो रद्द करण्यात यावा अन्यथा फुरसुंगी, उरूळीदेवाची या गावांची स्वतंत्र नगरपरिषद करावी, अशी मागणी नागरिकांनी केली होती. परंतु, आता नगरपरिषद होणार असली तरी यातून वसुली होणारा मिळकतकरही ग्रामपंचायतीच्या तुलनेत मोठाच असणार आहे. त्यामुळे या मुद्याची चर्चा होत आहे.