बीसीसीआयच्या फेस्टिव्हलची म्हणजेच आयपीएल स्पर्धेची सुरुवात नेहमीसारखीच थाटामाटात झाली. यंदा या स्पर्धेचे हे 16 वे वर्ष आहे. खरेतर हे वर्ष धोक्याचे मानले जाते व याच वर्षी या स्पर्धेच्याच नव्हे तर जगभरातील टी-20 लीगमुळे क्रिकेटच्या मूळ गुणवत्तेला व तंत्रालाच झालेला धोका समोर आला आहे. त्यामुळे या स्पर्धेत यंदाही तोच प्रश्न कायम आहे की, गुणवत्ता व तंत्राचे निश्चित मोजमाप काय?
2008 साली या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली व एका छोट्या रोपाचे रूपांतर भल्या मोठ्या वृक्षातही झाले. मात्र, फळे रसाळ व गोमटी अद्याप काही मिळालेली नाहीत हीच वस्तुस्थिती आहे. जे खेळाडू या स्पर्धेद्वारे भारतीय संघात आले त्यांचा दर्जा व निकष कसा ठरवणार. त्यांची गुणवत्ता कशी मोजणार व त्यांच्या तंत्राचा ऊहापोह कोणी करणार का, हे व असे कितीतरी प्रश्न अद्यापही कायम आहेत. या स्पर्धेच्या इतिहासात डोकावले तर मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज यांनीच जास्त वर्चस्व राखल्याचे दिसून येते. त्यात मुंबईने पाच वेळा तर चेन्नईने चार वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. कोलकाता नाइट रायडर्सने दोन वेळा, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद, डेक्कन चार्जर्स व गुजरात टायटन्स यांनी ही स्पर्धा प्रत्येकी एकदा जिंकली आहे. गेल्या मौसमात नव्याने दाखल झालेल्या गुजरातने पदार्पणातच स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली. आजवर या स्पर्धेतून भारतीय संघाला अनेक चांगले खेळाडू मिळाले हे सत्य कोणीही नाकारणार नाही. पण चांगले व महान यातील फरकही याच खेळाडूंमधून जगासमोर आला हे देखील सत्यच आहे.
कसोटी क्रिकेटला ग्रहण
ही स्पर्धा सुरू झाली तेव्हापासून या स्पर्धेने लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडले. क्रेझ तर इतकी होती की पूर्वी आमच्या मुलाला भारतीय संघातून कसोटी व एकदिवसीय क्रिकेट खेळवा असा तगादा लावणारे पालक आता आमच्या मुलाला किमान आयपीएल तरी खेळवा, असे सांगू लागले आहेत. आताही अफाट पैसा दिसत असल्याची हुशारी आहे की बौद्धिक दिवाळखोरी हे ज्याने त्याने ठरवावे. कसोटीचे निकाल न लागणारे पाच-पाच दिवस चालणारे रटाळ सामने, त्यातून एकदिवसीय क्रिकेटचा जन्म झाला. त्यानंतर 50 षटकांचे एकदिवसीय क्रिकेटही कंटाळवाणे होऊ लागले. पहिली पंधरा षटके व अखेरची पंधरा षटके आक्रमक फलंदाजी पाहायला मिळायची; परंतु मधली 20 षटके तेच ते रटाळ क्रिकेट दिसायचे. त्यातच इंग्लंडसह जगभरात फुटबॉलच्या लोकप्रियतेत क्रिकेट खूपच मागे पडत चालले होते.
सहा-सात तास चालणारे सामने पाहण्यासाठी प्रेक्षक तरी कुठून आणायचे. यातूच मग दुसऱ्यांदा पाळणा हलला व टी-20 क्रिकेट उदयाला आले. आता याच क्रिकेटचा भडिमार इतका झाला आहे की, जगभरातील नावाजलेले क्रिकेटपटू कसोटी क्रिकेट हवेच कशाला, असे म्हणण्यापर्यंत मजल मारू लागले. जर या धामधूमीतही कसोटी क्रिकेट जिवंत ठेवायचे असेल तर त्यासाठी काही उपाय करावेच लागतील अन्यथा या झटपट क्रिकेटच्या आक्रमणात कसोटी क्रिकेटला लागत असलेले ग्रहण कधी सुटणारच नाही.
प्रत्येक प्रकारासाठी वेगळे संघ हवेत
कसोटी, एकदिवसीय व टी-20 हे क्रिकेटचे तीनही प्रकार आता लोकप्रिय आहेत, मग त्यातून एका कोणत्याही प्रकाराला अन्य प्रकारापासून धोका होऊ नये यासाठी प्रत्येक देशाने ऑस्ट्रेलिया व इंग्लंडच्या धर्तीवर वेगवेगळे खेळाडू निवडत वेगवेगळे संघही तयार करावेत. म्हणजे कोणीच कोणाला मारक ठरणार नाही. ऑस्ट्रेलिया व इंग्लंड क्रिकेट मंडळाने हा प्रयोग सुरू केला आहे. त्यांनी कसोटी, एकदिवसीय व टी-20 या तीनही प्रकारांसाठी असे काही खेळाडू निश्चित केले आहेत की त्यांना ते सगळ्या क्रिकेटमध्ये खेळवत नाहीत. परिणामी हे खेळाडू ताजेतवाने राहतात व त्यांना ज्या संघासाठी निवडले आहे त्यात ते सातत्यपूर्ण कामगिरीही करताना दिसतात. भारतातही हा प्रयोग करायला हरकत नाही. आपल्या संघात असे अनेक खेळाडू आहेत की जे कसोटी सामन्यांसाठी योग्य नाहीत किंवा असे म्हणू की, असे काही खेळाडू आहेत जे केवळ कसोटी सामन्यांसाठीच योग्य आहेत.
पूर्वी राहुल द्रविडबद्दल जे बोलले जात होते तेच आता चेतेश्वर पुजाराबाबत बोलले जाते. तंत्रशुद्ध फलंदाजी हा टी-20 क्रिकेटचा निकषच नसल्याने तेथे त्याचे काय काम. सूर्यकुमार यादव, ऋषभ पंतसारखे खेळाडू टी-20 क्रिकेटच्या ऑक्सिजनवर येत्या काळात दिग्गज फलंदाज म्हणून कदाचित ओळखलेही जातील; परंतु त्यांची कसोटीतील कामगिरी पाहिली की लक्षात येते पायाच कमकुवत असेल तर त्यावर तंत्राची इमारत उभी राहीलच कशी? अर्थात काही खेळाडू असेही आहेत की ज्यांना पाणी म्हणू या का, म्हणजे त्यांना कोणत्याही सामन्यात खेळवा ते गुणवत्ता व कामगिरी सिद्ध करतातच. तरीही वेगवेगळे संघ, भिन्न खेळाडू यांचा प्रयोग यशस्वी होईल याची मात्र खात्री देता येईल.
केवळ “इंडियन पैसा लीग’ नको
आयपीएलवर ताशेरे ओढताना कधीकाळी महान क्रिकेटपटूंनी त्याचे वर्णन “इंडियन पैसा लीग’ असेही केले होते. अर्थात अशी टीका करणारेच आता याच स्पर्धेतील सामन्यांचे रसभरीत समालोचनही करतात हा भाग वेगळा. कोणत्याही गोष्टीच्या सुरुवातीला विरोध हा होतोच तसा आयपीएललाही झाला मात्र, तरीही ही लीग यशस्वी ठरली. त्याचे कारण या स्पर्धेची मागणी, अपेक्षा हे सगळे मूळ क्रिकेटलाच छेद देणारे होते. तुमच्याकडे तंत्र आहे का, खेळपट्टीवर उभे राहण्याची कुवत आहे का, शॉट सिलेक्शन आहे का, हे असले प्रश्न इथे कोणाला पडतच नाहीत. फलंदाजाने चौकार व षटकार फटकावला की तो महान बनलाच म्हणून समजा. मग याच फलंदाजाला कसोटी संघात घेतले की त्याचे काय होते ते आपण ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेत सूर्यकुमार यादवच्या उदाहरणावरून पाहिलेच असेल. सांगायचा मुद्दा हा की, ही लीग 16 वर्षांची झाली म्हणजेच आता वयात आली आहे.
वयाबरोबर इतरही काही गोष्टी येतात. केवळ पैसा कमावणे हेच एकमेव उद्दिष्ट निदान आता तरी राहू नये. जागतिक क्रिकेटला एकेकाळी पॅकर सर्कसने वेड लावले होते. त्यावर बंदी घातल्यावर याच कॅरी पॅकरने म्हटले होते की तो दिवस दूर नाही जेव्हा पांढरा चेंडू, प्रकाशझोतातील सामने व रंगीत कपडे घालून खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसतील. त्यांची दूरदृष्टी चुकीची नव्हती हे आज सहज दिसून येते. मग जर हे आपलेसे केले आहेच तर त्यात व्यावसायिकताही यावी; पण त्याबरोबरच गुणवत्ता व तंत्र झाकोळले जाऊ नये हीच अपेक्षा आहे. या लीगमुळे जास्तीत जास्त खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते, त्यांना पैसा मिळतो, स्थैर्य मिळते व मुख्य म्हणजे नावलौकीकही मिळतो यात शंका नाही. मात्र, केवळ पैसा किंवा नफा कमावणे व खेळाडूंना सातत्याने घाण्याला जुंपल्यासारखे सतत खेळवत राहणे योग्य नाही. कसोटीतील गुणवत्ता तर लयाला गेली आहेच, निदान या स्पर्धेतील तरी टिकून राहावी.
महिला क्रिकेटपटूंचीही प्रगती साधेल
यंदाच्या मौसमापासून बीसीसीआयने महिलांची पूर्णपणे वेगळी आयपीएल सुरू केली. मुंबई इंडियन्सने त्याचे पदार्पणातच विजेतेपद पटकावले. सुरुवात तर चांगली झाली आहे. मात्र, पुरुष खेळाडूंप्रमाणे महिला खेळाडूंचीही क्रेझ तयार होण्यासाठी काही काळ जावा लागेल. सध्या महिला क्रिकेटपटूंचे जे चाहते आहेत, त्यांच्या तोंडी स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर या दोन नावांच्या पुढे गाडी जाताना फारशी दिसत नाही. हेच चित्र बदलायला हवे. महिलांच्या प्रत्येक संघातील स्टार खेळाडूंची लोकप्रियताच त्यांच्या स्पर्धेला पूरक ठरेल. जे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड, महेंद्रसिंह धोनी, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, युवराज सिंग यांच्या नाममहिमेचा लाभ आयपीएलच्या पहिल्या मौसमापासून सातत्याने झाला तेच चित्र महिलांच्या स्पर्धेतही दिसले तरच त्याचीही प्रगती होईल. सचिन, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या स्टारडममुळे प्रभावित होत नवनवे खेळाडू क्रिकेटच्या मैदानावर हातपाय चालवू लागले व थोड्या चांगल्या दर्जाचे क्रिकेट खेळू लागले तसाच प्रगतीचा आलेख महिलांच्या स्पर्धेतूनही समोर आला पाहिजे.
अमित डोंगरे