सिंहगडरस्ता – दैनिक “प्रभात’चे प्रतिनिधी जयंत जाधव यांना त्यांच्या व्हॉट्सअपवर केबीसी मुंबईमधून कस्टमर ऑफिसर राजेश शर्मा बोलतोय आपल्याला एक शुभवार्ता द्यायची आहे, असा मेसेज आला. एअरटेल, वोडाफोन, आयडिया, जिओ या कंपन्यांच्या सीम वापरणाऱ्या पाच हजार ग्राहकांसाठी कंपनीतर्फे योजना असून त्यामधून 25 भाग्यवान ग्राहकांपैकी आपण एक आहात, तुम्हाला 25 लाखांची लॉटरी लागली आहे, असा उल्लेख करीत “केबीसी’चे एक तिकीट पाठवले गेले, त्यावर 9832358303 व्हॉट्सऍप नंबर होता. त्या नंबरवर कॉल करा, तुम्हाला पुढील माहिती मिळेल, असे नमूद करण्यात आले होते. दरम्यान, आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतरही या “फ्रॉड केबीसी लॉटरी’ची माहिती मिळवण्यासाठी जाधव यांनी सदर नंबरशी संपर्क साधला. यातून फसवणुकीची “सिस्टीम’ समोर आली.
सदर व्हॉट्सऍपवर कॉल केला असता लॉटरी मॅनेजर राणाप्रताप सिंग बोलत आहे. लॉकडाऊन आणि करोना यासाठी गरीब, गरजू नागरिकांसाठी कंपनीतर्फे अमिताभ बच्चन यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला आहे. त्यामध्ये तुम्हाला 25 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे.
यासाठी तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव, बॅंक अकाउंट नंबर आणि एक फोटो या नंबरला त्वरित व्हॉट्सऍप करावा लागेल. त्यानुसार त्या नंबरवर सदर माहिती व फोटो पाठविल्यानंतर तुमचे पेपर लवकरच तयार करून व्हॉट्सऍपवर पाठविण्यात येतील त्यामध्ये तुमच्या लॉटरीचे तिकीट असेल, बॅंकेचा चेक असेल जो तुम्ही बॅंकेत जाऊन भरू शकता. परंतु, तत्पूर्वी या लॉटरीचे चार्जेस म्हणून तुम्हाला 8100/- रुपये हे स्टेट बॅंक शाखा विनुकोंडा, आंध्र प्रदेश, खाते क्रमांक 37180050245 आयएफएस क्रमांक rbin 0000780. यावर भरावेत किंवा आयुष राज 9546322463 या मोबाइल क्रमांकावर फोन-पे, गुगल-पे, पे-टीएम करावेत, असे सांगण्यात आले. परंतु, जयंत जाधव याला बळी पडले नाहीत. याबाबत त्यांनी सिंहगड पोलिसांना दिली असून पुढील तपास सायबर क्राइमकडून सुरू करण्यात आला आहे.
ऑनलाइन केबीसी लॉटरीचा फ्रॉड सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही लॉटरी, लकी ड्रॉ आमच्या कंपन्यांकडून दिला जात नाही. नागरिकांनी सतर्क रहावे, भूलथापांना बळी पडू नये. असे काही कॉल आले तर त्वरित नजीकच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा
– हनुमान कदम, व्यवस्थापक, वोडाफोन,आयडिया, पुणे
नागरिकांनी अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, हा एक सापळा आहे. जे नागरिक मोबाइलसाठी नवीन सीम कार्ड घेतात, अशा लोकांना हे भामटे टार्गेट करीत आहेत. कोणतीही कंपनी फुकटचे 25 लाख रुपये देत नसते. हे नागरिकांनी लक्षात घ्यावे. कॉल आल्यास पोलिसांत तक्रार करावी.
– बलभीम ननावरे, सायबर क्राइम, शिवाजीनगर, पुणे