पुणे – पीएमपी प्रशासनाकडून जास्तीत जास्त बस मार्गावर आणल्या जात आहेत. तसेच, ताफ्यात ई-बस आल्यामुळे मागील वर्षभरात प्रवासी संख्येत दीड कोटींनी वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पन्न वाढले असून २०२३-२४ या आर्थिक वर्षात पीएमपीला तिकिट विक्रीतून जवळपास ७८ कोटींचे उत्पन्न मिळाल्याचे प्राशासनाकडून सांगण्यात आले.
पुणे, पिंपरी आणि पीएमआरडीएच्या हद्दीत पीएमपीकडून साधारण १ हजार ७०० बसच्या माध्यमातून प्रवाशांना सेवा दिली जाते. प्रत्येक वर्षी पीएमपीची संचालन तूट वाढत आहे. त्यामुळे त्या संचालन तुट भरून काढण्यासाठी दोन्ही महापालिकांना अतिरिक्त पैसे द्यावे लागत आहेत.
त्यात आता पीएमआरडीएकडून देखील वर्षाला १८७ कोटी रूपये दिले जात आहे. यंदाची रक्कम अद्याप मिळाली नसली तरी पीएमपीने ही रक्कम पीएमआरडीएकडे मागितली आहे. तसेच, पीएमपीकडून देखील गेल्या आर्थिक वर्षांत चांगली प्रवासी सेवा देऊन पीएमपीचे उत्पन्न वाढविण्यावर भर दिला आहे. त्यामुळेच प्रवासी संख्या आणि उत्पन्नामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
तत्कालीन अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी पदभार घेतल्यानंतर पीएमपीचे उत्पन्न वाढविण्याबरोबरच तोटा कमी करण्यावर अधिक भर दिला. तसेच, ब्रेक डाऊन कमी करून जास्तीत जास्त बस मार्गावर कशा राहतील याकडे लक्ष दिले. तसेच, पीएमपीच्या अधिकाऱ्यांना मार्गावर फिरायला लावले.
कमी उत्पन्न असलेल्या मार्गावर उत्पन्न वाढविण्याच्या जबाबदाऱ्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचा गेल्या आर्थिक वर्षात खूपच चांगला फायदा दिसून आला. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात सहा महिन्यांत प्रति किलोमीटर उत्पन्न ५० पेक्षा जास्त असल्याचे दिसून आले. ऑगस्ट महिन्यात तर एका महिन्यात सर्वाधिक ५७ कोटी रुपये उत्पन्न पीएमपीला मिळाले होते.
…तर उत्पन्नात घट
पीएमपीचे २०२२-२३ आर्थिक वर्षातील उत्पन्न ५३३ कोटी ४० लाख इतके आहे. तर प्रवासी संख्या ३५ कोटी ५६ लाख इतकी आहे. तेच २०२३-२४ मध्ये ६११ कोटी ६५ लाख उत्पन्न तर ३६ कोटी ५० लाख प्रवासी संख्या आहे. येत्या काही महिन्यांत पीएमपीच्या ताफ्यातील २६६ बस संचलनातून बाहेर पडतील.
तसेच, नवीन बस खरेदीला उशीर होत असल्याने पुढील काही महिन्यांत बससंख्या कमी झाल्याने उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.