पुणे – चित्रपट पुढील १०० वर्षे पाहू शकतो, परंतु नाटकाची जादू अशी आहे की, तेथे काम करणे हे पाण्यावर लिहिण्यासारखे आहे. जे होऊन गेले आहे, त्याच्या आठवणी आणि आख्यायिका ऐकण्याशिवाय पर्याय राहात नाही; कारण तो कलाकार गेला की त्याचे नाटक परत पाहणे शक्यच नसते, असे भावनिक प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी गुरुवारी केले.
महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि दिवंगत ज्येष्ठ अभिनेते डॉ.श्रीराम लागू परिवार यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या श्रीराम लागू रंग-अवकाश या प्रकल्पाचे उद्घाटन शहा यांच्या हस्ते गुरुवारी झाले. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री रत्ना शहा, डॉ. श्रीराम लागू यांच्या पत्नी दीपा, चिरंजीव डॉ. आनंद, ज्येष्ठ अभिनेते डॉ. आनंद आगाशे, महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे अध्यक्ष एस. पी. कुलकर्णी आदी उपस्थित होते.
मी जेव्हा व्यावसायिक अभिनेता बनलो तेव्हापासून श्रीराम लागूंचा हात माझ्या डोक्यावर आहे, असे मला वाटते. प्रत्यक्षात एकमेकांसोबत काम करण्याचे कधीच नशिबी आले नाही. परंतु अभिनय क्षेत्रात अनाहूतपणे त्यांनी जे मला दिले ते मी कधी सांगू शकत नाही. परंतु त्यांनी अभिनयाचा जो हात मला दिला त्यालाच मी आशीर्वाद समजतो. माझा कधी त्यांच्याशी जास्त परिचयही नव्हता आणि सोबत कामही करू शकलो नाही, अशी खंत शहा यांनी व्यक्त केली.
डॉ. लागू यांचे काम राष्ट्रीय नाट्य विद्यालयात शिकत असताना प्रथम पाहिले. १९७१ चा तो काळ होता. आधेअधुरे या नाटकातील त्यांचे काम पाहून माझा श्वास थांबला की काय, असे वाटत होते. आवाजाचा लवचिक वापर, डोळ्यातले भाव, सहजता, भावनांवरील कमालीचे नियंत्रण… सर्वच विलक्षण होते. मी त्यांची गिधाडे, कस्तुरीमृग, सूर्य पाहिलेला माणूस ही नाटके तसेच सामना हा चित्रपट पाहिला. मी असे काम कधी करू शकेन का, असा प्रश्न स्वतःला विचारला आणि नाही असे उत्तर मिळाले. पण नकळत एकलव्याप्रमाणे मी त्यांच्याकडून खूप शिकत राहिलो, असेही शहा म्हणाले.
डॉ. लागूंच्या आवाजातील उतार चढाव, शब्दफेक मला स्पष्ट ऐकू येत होते. त्यांच्या डोळ्यातील भाव मला स्पष्ट दिसत होते. ज्या सोप्या आणि सहजभावाने ते अभिनय करायचे आणि ते करताना ते त्यांच्या भावनांवरही नियंत्रण ठेवत असत. त्यावेळी त्यांचा अभिनय पाहून मला प्रेक्षागृहात उभे राहून नाचावे वाटले होते, अशी आठवण शहा यांनी सांगितली.
प्रास्ताविक डॉ. आगाशे यांनी केले. डॉ. आनंद लागू यांनी मनोगत व्यक्त केले. सेंटरच्या शुभांगी दामले यांनी सुदर्शन ते रंग-अवकाशपर्यंतचा रंगमंचीय स्थित्यंतराचा प्रवास सांगितला.
हिंदीत डॉ. लागूंना त्यांच्या तोडीची भूमिकाच मिळाली नाही
हिंदी चित्रपटात डॉ. लागूंना त्यांच्या तोडीची भूमिकाच मिळाली नाही, अशी खंत व्यक्त करून मी त्यांचा सामना हा चित्रपट पाहिला आणि मग खूप वाईट वाटले की त्यांनी ज्या हिंदी चित्रपटात काम केले त्या भूमिका त्यांच्या लायकीच्याच नव्हत्या, असे शहा म्हणाले.
आपल्या देशात रंगककर्मींच्या नावावर इतके कमी थिएटर्स का आहेत हा मला प्रश्नच आहे. येथे टागोर, गांधी, राजकारणी किंवा उद्योगपतींच्या नावावर थिएटर मिळेल परंतु जी नाटकाची जन्मभूमी आहे, अशा महाराष्ट्रातही एकाही कलाकाराच्या नावावर थिएटर नाही. काशीनाथ घाणेकर, बालगंधर्व यांच्याशिवाय कोणत्याही रंगकर्मी, रंगधर्मी यांच्या नावाचे थिएटर नाही. बंगाल, कर्नाटक मध्येही नाही, हिंदीतही नाही, याची खंत मला वाटते.