पुणे – महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने पुणे महापालिकेसाठी दैनंदिन पाणीवापर प्रतिव्यक्ती 150 लिटर इतका निश्चित केला आहे. मात्र, पालिका 271 लिटर प्रति माणसी याप्रमाणे पाणी उचलत आहे. पालिका मापदंडापेक्षा जास्तीचा पाणीवापर करत असल्याचा दावा जलसंपदा विभागाकडून करण्यात आला आहे. जास्तीचा पाणीवापर असाच सुरू ठेवल्यास उन्हाळ्यात ग्रामीण भागास पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी अपुरे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मापदंडानुसारच पालिकेने पाणीवापर करणे बंधनकारक असल्याचे जलसंपदा विभागाने म्हटले आहे.
जलसंपदा विभागाने पोलीस बंदोबस्तात पाणी नियंत्रित करणार असल्याचे पत्र गुरुवारी पालिकेला दिले. त्यामुळे पाणी प्रश्न पेटला आहे. यावरून जुंपली असताना आता त्यावर जलसंपदा विभागाने पालिका जादा पाणी उचलत असल्याचा आक्षेप घेतला आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून भामा-आसखेड धरणातून पुणे महापालिकेला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर खडकवासला प्रकल्पातून पाणीवापर कमी होणार असल्याचे पुणे महापालिकेकडून सातत्याने सांगण्यात येत होते; परंतु प्रत्यक्षात नोव्हेंबर 2020 पासून भामा-आसखेड धरणातून पाणीवापर सुरू झाला, तरी पालिकेने खडकवासला धरणातून पाणीवापर कमी केलेला नसल्याचे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
खडकवासला धरणातून पाणीवापर नियंत्रित केला, तर रब्बी हंगामात दोन व उन्हाळा हंगामात 1 आर्वतन होऊ शकतील. तसेच मागील वर्षाच्या तुलनेत खडकवासला प्रकल्पात 1.46 टीएमसी पाणीसाठा कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.