पुणे – महापालिका हद्दीत समाविष्ट नांदेड गावातील अतिक्रमण निर्मूलन कारवाई शुक्रवारी पालिकेच्या अंगलट आली. कारवाईमुळे संतापलेल्या जागा मालकाने आपल्या विहिरीतून चार गावांना केला जाणारा पाणीपुरवठाच बंद केला. त्यामुळे अधिकाऱ्यांची अक्षरश: धावपळ उडाली. त्यानंतर पालिकेच्या विनंतीला मान देत या नागरिकाने दुपारनंतर पुन्हा पंप सुरू केल्याने या चार गावांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत झाला.
नांदेड, नांदोशी, किरकटवाडी, सणसनगर या गावांना नांदेड गावातील एका खासगी विहिरीतून सुमारे 30 वर्षांपासून पाणीपुरवठा होत आहे. खडकवासला धरणातून कॅनॉलमधून येणारे पाणी या विहिरीमध्ये सोडले जाते. त्यानंतर तेथून गावांमध्ये जलवाहिनीतून पोचवले जाते. ही विहीर खासगी असली, तरी जागामालक त्याचे कोणतेही शुल्क घेत नाहीत. ही बाब महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागास माहिती नव्हती.
दरम्यान, याच व्यक्तीचे नांदेड गाव परिसरात एक अतिक्रमण होते. त्यावर कर्मचाऱ्यांनी नियमितपणे आपली कारवाई केली. त्यामुळे संतापलेल्या या नागरिकाने आपल्या विहिरीतून या चार गावांना जाणारे पाणीच बंद केले. परिणामी, अचानक पाणी बंद झाल्याने या गावांमधील नागरिकांची तारांबळ उडाली. त्यानंतर या नागरिकास राजकीय पदाधिकाऱ्यांनीही विनंती केली. मात्र, महापालिका ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत पाणी सुरूच करणार नसल्याची भूमिका त्या व्यक्तीने घेतली. त्यामुळे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर आणि अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांनी नांदेड गावात या नागरिकांशी चर्चा करत त्यांची समजूत घातली.