येरवडा अशोकनगरमधील नागरिकांचा सवाल; नगरसेवकांचे दुर्लक्ष
येरवडा – ड्रेनेजलाइनचे काम करुन द्या, यासाठी नगरसेवक, पालिकेचे अधिकारी यांना वारंवार विनंती केली. आता, काय याकामासाठी पंतप्रधानांना सांगायचे काय? असा संतप्त सवाल येरवडा अशोकनगर निर्मल हाऊसिंग सोसायटीमधील नागरिकांनी केला आहे.
येरवडा प्रभाग क्रमांक 6 येथील म्हाडा घरकुल योजनेंतर्गत बांधलेल्या निर्मल को.ऑप हॉउसिंग सोसायटी येथे साधारण 30 ते 35 घरांना ड्रेनेजच्या तुंबलेल्या लाइनचा त्रास मागील दोन वर्षांपासून होत आहे. दररोज सकाळी ड्रेनेजचे पाणी घराबाहेर साचून तळे तयार होते, येण्या जाण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर विटा ठेवलेल्या आहेत. ड्रेनेजलाइन आणि पिण्याच्या पाण्याच्या लाइनही नादुरुस्त असल्याने पिण्याच्या पाण्याचा घाण वास येतो. यातून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य निरीक्षकही याकडे दुर्लक्ष करीत आहेत. स्थानिक नगरसेवक निधी नसल्याचे सांगतात. फक्त जेटिंग मशीन आणून कचरा, गाळ काढण्याचे काम पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून केले जाते.
येथील मलनिस्सारण वाहिन्या जुन्या झाल्याने त्या बदलण्याची मागणी येथील स्थानिक नागरिक रेश्मा कोंडविणकर, विजया रणपिसे, सागर रोकडे,रमाकांत शर्मा, इलियास शेख, अर्चना शेलार, माया शर्मा, राणी तुपसमिंदर, जयश्री रोकडे, रुपाली भसे, राणे वाघमारे, सुषमा खरात, संगिता खरात यांनी प्रभाग 6च्या चारही नगरसेवकांकडे केली असून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे.
ड्रनेजलाइन नादुरूस्त असल्याची तक्रार आली होती. पालिका अधिकाऱ्यांना सांगून तात्पुरत्या स्वरूपात काम करण्यात आले आहे. याकामासाठी आमदार निधी मिळण्यासाठी पाठपुरावा करू.
– शैलेश राजगुरू, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस