सर्वपक्षीय इच्छुकांची जोरदार तयारी
राजेंद्र काळभोर
लोणी काळभोर – आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत प्रभाग रचना व आरक्षण हे दोन मुद्दे जवळपास निकालात निघाले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी होणार की नाही? तसेच भाजपा व शिंदे गट ही निवडणूक एकत्र लढवणार कि नाही हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत. तरीही ऐनवेळी उशीर व्हायला नको म्हणून इच्छुकांनी आपापल्या पद्धतीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
नियमित वेळापत्रकानुसार फेब्रुवारी 2022 मध्ये पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समितीची पंचवार्षिक निवडणूक होणार होती. परंतु वेगवेगळ्या कारणांनी ही निवडणूक लांबणीवर गेली. प्रभाग रचना, आरक्षण नुकतेच करण्यात आले आहे. त्यामुळे हे दोन मुद्दे निकालात निघाले आहेत. हवेली पंचायत समितीच्या हद्दीतील काही गावे गेल्या काही वर्षांत पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेली आहेत. त्यामुळे प्रशासनाने ही गावे वगळून प्रभाग रचना केली आहे. उरुळी देवाची, फुरसुंगी, शेवाळेवाडी, शिवणे, मुंढवा, केशवनगर, साडेसतरा नळी, खडकवासला, नऱ्हे, आंबेगाव, धायरी, लोहगाव आदी गावे पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आली आहेत.
सध्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचे महाविकास आघाडी सरकार जाऊन शिंदे गट व भाजप सत्तेवर आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका एकत्र येऊन लढविणार कि स्वबळावर लढविणार या बाबतीत ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. जिल्हा पातळीवर याचा निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी मध्यंतरी केले होते. मात्र जोपर्यंत ठाम व ठोस निर्णय होणार नाही तोपर्यंत महाविकास आघाडीतील प्रत्येक इच्छुकाचा जीव टांगणीला लागून राहणार आहे.
…त्यानंतरच निवडणुकीत रंग भरणार
यंदाच्या निवडणुकीत लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथील राजकीय दृष्ट्या बलाढ्य उमेदवारांचा समावेश असलेल्या ग्रामपंचायतींचा मिळून एक जिल्हा परिषद गट तयार होण्याची शक्यता स्थानिक राजकारणातील तज्ज्ञ व्यक्त करीत होते. मात्र तसे झाले नाही. या दोन्ही ग्रामपंचायती वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटात आहेत. भारतीय जनता पक्ष, शिंदे गट व सहयोगी पक्ष एकत्र येणार कि नाही तसेच महाविकास आघाडी होणार कि नाही या प्रश्नांचे उत्तर मिळाल्यानंतरच या निवडणुकीत रंग भरण्यास सुरूवात होणार आहे. तोपर्यंत पारावरच्या गप्पा जोरदार रंगत आहेत.
नागरीकरणाचे अनेक प्रश्न कायम
शहरालगत असलेल्या हवेली तालुक्यात नागरीकरणाचे अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, वाहतुककोंडी, रस्त्यांची दुरवस्था, वाढत्या शहरीकरणामुळे नागरी सुविधांवर येणारा प्रचंड ताण यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. हवेली तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती मोठ्या असल्या तरी वाढत्या नागरीकरणाला सुविधा उपलब्ध करून देण्यात त्या कमी पडत आहेत. शहरालगतच्या या भागाच्या विकासाचे कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने बरेच प्रश्न वर्षानुवर्षे तसेच पडून आहेत.