प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 2 -शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवचरित्रावर आक्षेप घेणारी पिढी निर्माण झाली. तुम्ही कौतुक करा किंवा टीका करा, त्यासाठीचा आधार हे पुरंदरे यांचे शिवचरित्रच असते. यातच पुरंदरे यांचे मोठेपण सामावले आहे, अशा शब्दांत मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचा गौरव केला. पुरंदरे यांच्या शिवचरित्रावर काही बोलल्याशिवाय मोठे होताच येत नाही, असेच टीका करणाऱ्या प्रत्येकाला वाटते, असे डॉ. देगलूरकर म्हणाले.
महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठानच्या वतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते डॉ. देगलूरकर यांना “शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ,भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, वसुंधरा देगलूरकर, पुनीत बालन ग्रुपचे पुनीत बालन आणि पुरंदरे यांचे पुत्र अमृत या वेळी होते. इतिहास अभ्यासक संदीप तिखे यांना “श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे शिष्यवृत्ती’ प्रदान करण्यात आली.
बाबासाहेबांचा आणि माझा सहवास 65 वर्षांचा आहे. राजा शिवछत्रपती ग्रंथ जन्माचे डोहाळे त्यांना लागले होते त्या काळापासूनचा मी साक्षीदार आहे, असे डॉ. देगलूरकर यांनी सांगितले.व्याख्यानमालेचे तिकिट काढणारे एकमेव वक्ते मी बाबासाहेबांच्या रूपामध्ये पाहिले, अशी आठवण पाटील यांनी जागवली. प्रतिष्ठानच्या कार्यासाठी इंद्राणी बालन फाउंडेशनच्या वतीने 11 लाख रुपयांची देणगी पुनीत बालन यांनी जाहीर केली. अभिषेक जाधव यांनी प्रास्ताविक केले.
बाबासाहेब हे आम्हा मंगेशकर भावंडांना वडिलांसमान होते. त्यांची शताब्दी लतादीदीला साजरी करायची होती. पण, नियतीला ते मान्य नसावे. ते सदैव इतिहासात वावरायचे. त्यांच्या “फुलवंती’ कथेवर मी दूरदर्शन मालिका केली होती. त्यावेळी त्यांच्याकडून मला शिकायला मिळाले.
– उषा मंगेशकर, ज्येष्ठ पार्श्वगायिका