निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष : चिठ्ठी कोणाला तारणार
भाऊ ठाकूर
राहू – दौंड बाजार समितीत भाजपाने राष्ट्रवादीच्या प्रस्थापित सत्तेला हादरा दिल्याने सामना बरोबरीत सोडविल्याने आता सभापती पदाच्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. राष्ट्रवादीला आता नशिब तारणार का भाजपाला चिठ्ठी तारणार, याची चर्चा सुरू झाली आहे.
दौंडमध्ये सध्या कोण बनेगा सभापती या विषयावर चर्चा रंगू लागल्या आहेत. मतदारांनी दोन्ही पक्षाला समसमान मते दिल्यामुळे कोणाची पार्टी जड होणार, याकडे दौंड तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. अटीतटीच्या निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादीच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपाने नऊ जागा जिंकत सुरूंग लावला आहे. त्यामुळे भाजपाचे कार्यकर्ते सध्या फुल जोशात आहेत, तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बचावात्मक भूमिका घेताना दिसत आहेत.
दोन्ही बाजूला नऊ नऊ जागा मिळाल्यामुळे सभापतीपदाचा पेच निर्माण झाला आहे. भाजपाने पूर्ण ताकद लावली असली तरी राष्ट्रवादीच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षाला फटका बसल्याची चर्चा सध्या राष्ट्रवादीच्या गोटातून होत आहे. भाजपाने देखील पूर्ण वेळ देऊन नियोजन केले होते. त्यामुळे चांगले यश प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादीच्या भाकरी फिरविण्याचा भूमिकेमुळे अंतर्गत नाराजी तयार होऊन त्याचा फटका बसल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादीची अनेक दिवसापासून सत्ता असल्यामुळे राष्ट्रवादीकडे जुन्या नव्यांची मोठ्या प्रमाणात उमेदवारीची मागणी होती. परंतु सर्वांना उमेदवारी देणे शक्य नव्हते. त्यामुळे नाराजी वाढली. नवीन चेहरे देण्याच्या भूमिकेमुळे अनेक जुनी जाणती मंडळी नाराज झाल्याचे बोलले जात आहे. या जुन्या जाणत्या मंडळींनी पक्षाविरोधी काम केले नाही. परंतु मन लावून प्रचार न करण्याची भूमिका घेतल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला निवडणुकीत फटका बसल्याची चर्चा आहे. ज्या गटात ज्या समाजाचे प्राबल्य आहे. त्याप्रमाणात उमेदवारी न दिली गेल्यामुळे क्रॉस मतदान झाल्याची देखील चर्चा रंगत आहे.
राष्ट्रवादी पक्षाने ज्याच्या सोसायटी मतदारसंघाच्या जिवावर आत्तापर्यंत जिल्हा बॅंकेचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्या सोसायटी मतदारसंघात भाजपाने मुसंडी मारल्यामुळे राष्ट्रवादीला विचार करण्याची वेळ आली आहे. ग्रामपंचायत मतदारसंघात देखील मागील निवडणुकीत मोठ्या फरकाने राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले होते. परंतु या निवडणुकीत तो फरक संपुष्टात येऊन भाजपाचे उमेदवार मोठ्या फरकाने विजय झाले आहेत. याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज राष्ट्रवादीवर आहे.
चिठ्ठी उघडणार नशीब
दौंडमध्ये सध्या फक्त कोण बनेगा सभापती हीच चर्चा पारापारावर सुरू आहे. मतदारांनी दोन्ही नेत्यांना समसमान जागा दिल्यामुळे सभापतीपदाचा पेच निर्माण झाला आहे. भाजपाला अनेक वर्षातून बाजार समितीची सत्ता आल्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. तर राष्ट्रवादीला आपली पकड जाग्यावर ठेवण्यासाठी कंबर कसावी लागणार आहे. परंतु यामध्ये कोणत्याही बाजूने संचालक फुटण्याची अजिबात शक्यता नसल्यामुळे दोन्ही पक्षांचे नशीब हे चिठ्ठीवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे चिठीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.