पुणे – केंद्र शासनाच्या “पीएमश्री’ योजनेअंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिकच्या 426 तर माध्यमिकच्या 90 अशा एकुण 516 शाळांचा विकास करुन यांना आदर्श शाळा बनविण्यात येणार आहे.या शाळांची यादी निश्चित करण्यातआली आहे. यात पुण्यातील 23 शाळांचा कायापालट होणार आहे.
उत्कृष्ट पायाभूत सुविधांसह, योग्य संसाधनासह, आनंददायी व उत्साहवर्धक शैक्षणिकदृष्ट्या अनुकूल वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील देशातील 15 हजारांहून अधिक शाळा उत्कृष्ट शाळा बनविण्यात येणार आहे.
त्यानंतर 2 लाख 50 हजार शाळा उत्कृष्ट करण्याचे नियोजित आहे. केंद्र शासनाकडून 60 टक्ते तर राज्य शासनाकडून 40 टक्के याप्रमाणे शाळांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील प्रत्येक गटातून 2 शाळा याप्रमाणे 846 शाळा विकसित करायचा असून प्रतिशाळा 1 कोटी 88 लाख रुपयांची तरतूद विचारात घेता केंद्र शासनाकडून 60 टक्के प्रमाणे 1 कोटी 13 लाख रुपयानुसार पाच वर्षासाठी केंद्र हिस्सा 955 कोटी 98 लाख रुपये मिळणार आहेत. अभ्यासक्रम, प्रवेश आणि पायाभूत सुविधा, मानव संसाधन व शालेय नेतृृत्व, समावेशक पद्धती, व्यवस्थापन, देखरेख व प्रशासन, लाभार्थी समाधान आदी “पीएमश्री’ शाळांची उद्दिष्टे आहेत. योजनेअंतर्गत निवड झालेल्या शाळांच्या नावासमोर “पीएमश्री’ शाळा असे नाव देण्यात येत आहे.