वाल्हे – मागील आठवड्यापासून वाल्हे (ता. पुरंदर) परिसरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्याने, वातावरणातील थंडी कमी झाली आहे. रब्बी हंगामातील पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले थंडी पुरेशाप्रमाणात पडत नसल्याने, गहू, हरभरा, कांदा, ज्वारी, मका, ऊस उत्पादन शेतकरी वर्ग चिंताग्रस्त होत आहेत.
रब्बी हंगामातील गहू, हरभरा व कांदे, ज्वारी, मका पिकांसाठी थंडी लाभदायक असते. पिकांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या रब्बी पिकांना थंडीचा मोठा फायदा होतो. यात प्रामुख्याने गहू, हरभरा, ज्वारी या पिकांची वाढ जोमाने होऊन त्यामधील दाणे परिपक्व होण्यासाठी थंडीची आवश्यकता आहे. रब्बी हंगामातील पिकांना थंडी पोषक असते. पिकांच्या वाढीसह रोगांचा प्रादुर्भाव यामुळे कमी होतो; परंतु हीच थंडी कमी झाल्याने शेतकरी थंडीच्या प्रतिक्षेत आहेत.
थंडी वाढली तरच उत्पादन वाढीस थंडीचा निश्चितच फायदा होईल. गहू, हरभरा, कांदा, मका, ज्वारी पिकांमध्ये चार पैसे शेतकर्यांना मिळतील, अशी आशा वाल्हे परिसरामधील शेतकरीवर्गाला आहे. वातावरणातील बदलाने, अधूनमधून होणारे ढगाळ हवामानामुळेही, पिकांवर किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे, शेतकरी चिंतातूर झाले आहेत.