उरुळी कांचन -करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शनिवार (दि.20) पासून उरुळी कांचन (ता. हवेली) हद्दीतील सर्व व्यवहार व रविवारचा आठवडे बाजार पुढील तीन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सरपंच संतोष हरीभाऊ कांचन यांनी दिली.
ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रा. के. डी. कांचन, पंचायत समितीच्या माजी उपसभापती हेमलता बडेकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष कांचन, सरपंच संतोष ऊर्फ पप्पू कांचन, ग्रामपंचायत सदस्य अमित कांचन, भाऊसाहेब कांचन, मिलिंद जगताप, शंकर बडेकर, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस उपस्थित होते.
ग्रामपंचायत प्रशासनाने जाहीर केलेल्या या निर्णयावर सामाजिक संघटना व व्यापारी वर्गाने विरोध दर्शवला आहे. ग्रामपंचायत प्रशासनस्थळी असलेल्या मंडळींनी जनतेला विश्वासात घेऊन निर्णय घेतला नसल्याची भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. उरुळी हद्दीतील सर्व दुकाने, किराणा, हॉटेल, व बाजार पुढील तीन दिवस कडकडीत बंद होणार आहते. यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
पुढील चार दिवस मंगळवार, ते शुक्रवार या चार दिवसांत सर्व प्रकारची दुकाने ही सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत सुरू राहणार आहेत. हॉटेल संध्याकाळी सहा ते रात्री दहापर्यंत सुरू राहणार आहेत. सर्व दुकानातील दुकानदारांचे सुपर स्प्रेडर चेक केले जाणार आहेत. मास्क न घालणाऱ्या दुकानदारांकडून एक हजार रुपये दंड तर ज्या नागरिकांकडे मास्क नाही अशांकडून पाचशे रुपये दंड वसूल करणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
उरुळी कांचनमध्ये शनिवारपासून तीन दिवस सर्व बाजार बंद करण्यात येणार असून फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. हद्दीतील सर्वच कार्यालय, धार्मिक कार्यक्रमामध्ये पन्नासपेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही. जास्त आढळल्यास पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार गुन्हा दाखल करून दंड वसूल करण्यात येणार आहे.
– संतोष कांचन, सरपंच, उरुळी कांचन.