पळसदेव – पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यांना वरदान ठरलेले उजनी धरण दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. गतवर्षी जानेवारी महिन्यात शंभर टक्के पाणीसाठा असलेल्या या धरणात यंदा मात्र केवळ 15 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. यातही आगामी सहा महिन्यात नदी, कालवा, पाणी योजनांव्दारे तीन आवर्तने सोलापूर जिल्ह्याला देणे निश्चित असल्याने, यंदा धरण कोरडे पडणार आहे.
परिणामी तीव्र टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता असल्याने, पुणे व नगर जिल्यातील पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्त शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. 5 जानेवारीनंतर पहिले आवर्तन देण्यास सुरवात केली जाणार असून, यानंतर मार्च व मे महिन्यात सोलापूर जिल्ह्याला पाणी दिले जाणार आहे.
यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरण 60 टक्के (95 टीएमसी) भरले होते. यामध्ये 63 टीएमसी मृत पाणीसाठा तर 32 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. यापैकी आतापर्यंत 24 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. यामध्ये कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला तर कालवा व इतर पाणी योजनांव्दारे हे पाणी वापरले गेले आहे. सध्या केवळ 15 टक्के उपयुक्त साठा 8 टीएमसी उपलब्ध आहे.
तर आगामी सहा महिन्यांमध्ये सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची, शेतीची व औद्योगिक क्षेत्राची पाण्याची गरज भागविणे तारेवरची कसरत ठरणार आहे. धरणग्रस्तांच्या हक्काच्या पाण्यावर गदा न आणता सोलापूरला पाणी देण्याचे नियोजन करण्याची गरज असल्याचे मत स्थानिक शेतकरी व्यक्त करत आहेत.
भीमा नदीच्या पात्रात बांधण्यात आलेले उजनी हे राज्यातील सर्वांत मोठ्या धरणांपैकी दुसर्या क्रमांकाचे धरण आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता 111 टक्के भरल्यानंतर 123 टिएमसी आहे. यामध्ये 63 टीएमसी पाणी हे मृतसाठा म्हणून तर उर्वरित 54 टीएमसी पाणी हे उपयुक्त पाणी म्हणून साठविले जाते. धरणाची भिंत सोलापूर जिल्ह्यात असून, सर्वाधिक पाणीसाठा पुणे जिल्ह्यात होतो.
धरणाचा बॅकवॉटर पट्टा मोठा असून, सुमारे 6 किलोमिटरहून अधिक रुंदी व 140 किलोमिटर लांबी असलेल्या या पाण्यावर सुमारे चाळीसहून अधिक सहकारी व खासगी साखर कारखाने, 15 औद्योगिक वसाहती, शेती व शेतीपूरक व्यवसाय अवलंबून असल्याने, दरवर्षी 30 हजार कोटींहून अधिकची उलाढाल होते. गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी सर्वांत मोठे कोठार म्हणून या जलाशयाकडे पाहिले जाते.
धरणातील पाणी सोलापूर जिल्ह्यासाठी सीना-माढा, दहीगाव या योजना, बोगदा, मुख्य कालवा व नदीव्दारे दिले जाते. मागील काही वर्षांच्या नोंदीवर नजर टाकल्यास सन 2010, 2018, 2020 ते 2022 या वर्षांमध्ये जानेवारीमध्ये धरणात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याचे आढळून आले. यंदा मात्र धरणातील पाणी पातळीने शंभर टक्क्यांचा टप्पा गाठला नाही. तर जानेवारी, मार्च व मे महिन्यात सोलापूर जिल्ह्यासाठी संभाव्य आवर्तन दिली जाणार आहेत.
नदीतून पाणी देण्यासाठी एका आवर्तनासाठी सुमारे 6 टीएमसी पाण्याची आवश्यक असते. एकंदरीत पावसाळ्यापर्यंत आवर्तनाचा विचार केल्यास मृत साठ्यातील सुमारे 60 टक्के म्हणजे 30 टीएमसीहून अधिक पाणी वापरले जाणार आहे. उरलेल्या पाणी साठ्यातू सुमारे 5 टीएमसी गाळाचे प्रमाण वजा केल्यास उरणारे पाणी केवळ बघत बसण्याची वेळ धरणग्रस्त शेतकर्यांवर येणार आहे.
“धरणातील पाण्यापैकी धरणग्रस्तांसाठी उपयुक्त साठ्यातील 9.60 टीएमसी पाणी राखीव ठेवणे गरजेचे आहे. धरणातील मृतसाठा वगळता उपयुक्त साठ्यातील धरणग्रस्तांच्या वाट्याचे पाणी वगळून पाणी वाटपाचे नियोजन गरजेचे आहे. वास्तविक उपयुक्त साठ्यासह मृत साठ्यातील पाण्याचा वापर होतो आहे. पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली पावसाळ्यानंतर धरणातील पाणी बेकायदेशीरपणे नदीतून सोडले जाते. परिणामी उन्हाळ्यात प्रकल्पग्रस्त शेतकर्यांची मोठी परवड होते. यामुळे धरणग्रस्तांच्या हक्काच्या पाण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे.” – अरविंद जगताप, उजनी धरणग्रस्त बचाव कृती समिती