रेडा -भारत बंदला इंदापूरकरांनी उदंड प्रतिसाद देत शहर कडकडीत बंद पाळण्यात आला. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने कडकडीत बंद ठेवल्याने जवळपास 35 ते 40 लाखांची होणारी उलाढाल थंडावली.
इंदापूर शहरात मुख्य बाजार पेठ, चाळीस फुटी रोड, इंदापूर नगरपरिषद व्यापारी संकुल तसेच सर्व भागातील सर्व छोटे-मोठे व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. तर भाजी मंडईत दररोज दिसणारी शेतकऱ्यांची गर्दी आज दिसली नाही.
इंदापूर तालुक्यात ठिकठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला होता. त्यामध्ये राज्य राखीव पोलीस बल गटाचा फौजफाटा ठिकठिकाणी तैनात होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. अनेक संघटनांनी तहसिल प्रशासनाला निवेदने देवून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आणि केंद्र सरकारने शेतकरी विरोधी बिल रद्द करावे, अशी मागणी केली.
बंदला इंदापूर तालुक्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. इंदापूर कृषी उत्त्पन्न बाजार समिती, वालचंदनगर, भिगवण उपबाजार समित्यांमध्ये दिवसभर एकही शेतकरी आणि व्यापारी फिरकले नाहीत. त्याचबरोबर दररोज सकाळी भरणारा मासळी बाजारही दिवसभर बंद होता.
– वैभव दोशी, सचिव, कृषी उत्त्पन्न बाजार समिती, इंदापूर