मंचरमध्ये श्रीराम लल्लाची प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा आनंदोत्सव
मंचर – अयोध्येतील श्रीराम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंदोत्सव मंचर शहरात उत्साहाने साजरा करण्यात आला. रामरक्षा स्त्रोत वाचन हजारो महिलांनी केले. पाच हजार लाडूंचे वाटप करण्यात आले. तसेच महाप्रसाद व आरती आदींसह धार्मिक कार्यक्रम पार पडले.
अयोध्यातील प्राणप्रतिष्ठा सोहळा भाविकांना स्क्रीनवर लाइव्ह दाखवण्यात आला. यावेळी वातावरण राममय झाले होते. अयोध्या येथील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मंचर शहर राममय झाले होते. धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नागरिकांनी आपल्या घरासमोर गुढी उभारून तसेच घरावर श्रीरामांची प्रतिमा असलेला भगवे ध्वज लावून आनंदोत्सव साजरा केला. मंचर शहरातील श्रीराम मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. येथे पहाटे 100 महिलांनी रामरक्षा स्त्रोत वाचन केले त्यानंतर काकडा झाला. विठ्ठल-रुक्मिणी पारायण मंडळाच्या वारकर्यांनी पारायण केले.
दरम्यान, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी भाजप नेते संजय थोरात, डॉ. ताराचंद कराळे, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, तालुकाप्रमुख संतोष डोके, सल्लागार शशिकांत बाणखेले, शिवाजी राजगुरू, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, संचालक योगेश बाणखेले, रामदास बाणखेले, माजी ग्रामपंचायत सदस्य वसंतराव बाणखेले, प्रवीण मोरडे, संतोष खामकर, गणेश खानदेशे, गणेश राऊत, योगेश थोरात यांच्यासह भावी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जैन समाजाच्या वतीने भाविकांना सकाळपासून रात्री उशिरापर्यंत पाच हजार लाडू व केशर दुधाचे वाटप करण्यात आले. दुपारी महिलाचा हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला. त्यानंतर सुमारे 1000 महिलांनी रामरक्षा स्त्रोत्र वाचन केले. ज्ञानेश्वर महाराज फलके यांचे कीर्तन झाले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी महाप्रसाद देण्यात आला.
महाप्रसादाचा मसाला नितीकडून
महाप्रसादासाठी लागणारा मसाला अवसरी खुर्द येथील शाही नीती मसाल्याचे मालक उद्योजक मिलिंद खुडे यांनी मोफत दिला. रात्री मंचर शहरातील सर्व मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्याची आतिशबाजी करत तसेच विद्युत रोषणाई करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शहरात ठीकठिकाणी भगव्या पताका व भगवे झेंडे लावण्यात आले होते. बहुतेक रस्त्यावर स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. दिवसभर शहरात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते. दुचाकीवरून फिरणारे तरुण डोक्यात भगव्या टोप्या घालून जय श्रीरामच्या घोषणा देत होते.